मुंबई - राज्यातील उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान देण्यात यावे. तसेच मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कांद्यासाठी भावांतर योजना लागू करावी, कांदा निर्यातीस प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीच्या समाप्तीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नसून, याप्रश्नी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले आहे.
रावते म्हणाले, की मध्य प्रदेश सरकारने यापूर्वी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी 800 रुपये प्रति क्विंटल भाव निश्चित करून हा भाव व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळालेला भाव यातील फरकाची रक्कम भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली होती. त्याच धर्तीवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करावी. सध्या शेतकऱ्यांना सर्वसाधारण 351 रुपये प्रति क्विंटल दराने उन्हाळी कांदा विक्री करावा लागत आहे. हा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे.
शेतकऱ्यांना किमान उत्पादन खर्च मिळावा यासाठी उन्हाळी कांदा विक्रीवर 500 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी रावते यांनी केली आहे. कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत सध्या निर्यातदारांना 5 टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. त्यात 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात यावी. यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा. सध्या द्राक्षे, डाळिंब, लसूण इत्यादी शेतीमाल खरेदी व निर्यात करणाऱ्या व्यापारी वर्गास 25 ते 30 टक्के वाहतूक अनुदान दिले जाते. त्याच धर्तीवर कांद्याची खरेदी व निर्यात करणाऱ्या खरेदीदारांना शासनाकडून वाहतूक अनुदान देण्यात यावे. यामुळे कांदा खरेदीदारांच्या खर्चात बचत होऊन ते शेतकऱ्यांकडून वाढीव दराने कांदा खरेदी करतील, असे दिवाकर रावते यांनी म्हटले आहे.
|