मुंबई - राज्यातील सुमारे आठ हजार ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांसंदर्भात इच्छुक महिला उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया व ग्रामपंचायत कारभाराच्या दृष्टीने अधिकाधिक सक्षमीकरण करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिले.
ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात आयोगाच्या कार्यालयात नुकतीच बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. सहारिया यांनी सांगितले, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील 50 टक्के आरक्षण हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. आता सर्वच समाज घटकांतील अधिकाधिक महिलांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढला पाहिजे. त्यासाठीच इच्छुक महिला उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया आणि ग्रामपंचायतीचा कारभार याविषयी माहिती होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय विभाजनात सर्व वस्त्या व वाड्यांचा समावेश झाला पाहिजे. कोणीही मतदानापासून किंवा निवडणूक लढविण्यापासून वंचित राहू नये. निवडणुकांच्या वेळी मतदार शिक्षण आणि जागृती केली पाहिजे.
संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्याबाबत महिला उमेदवारांना प्रशिक्षणदेखील दिले पाहिजे, असेही सहारिया यांनी सांगितले.
|