सातही विभागांत 183 कारखान्यांचे गाळप सुरू
पंढरपूर - यंदाच्या बंपर ऊस उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजअखेर 614.58 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 66.10 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. दरम्यान, या वर्षी ऊस उत्पादन वाढले असले तरी गतवर्षीपेक्षा 0.28 टक्क्यांनी साखर उतारा घटला आहे.
यंदा राज्यातील सातही विभागांत 183 कारखान्यांचे गाळप सुरू आहे. 97 दिवसांमध्ये सर्वाधिक पुणे विभागात 241.36 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 25.85 लाख टन साखर उत्पादन झाले; तर सर्वांत कमी नागपूर विभागात फक्त चार लाख 11 हजार टन गाळप झाले असून 39 हजार टन साखर उत्पादन झाले आहे.
यंदाच्या हंगामासाठी नऊ लाख हेक्टरवर उसाचे पीक आहे. त्यामुळे या हंगामात 720 लाख टन गाळप होईल, असा अंदाज आहे. ऊस उत्पादन वाढल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक गाळप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आणखी दोन महिने गाळप हंगाम चालेल, असा साखर तज्ज्ञांचा अंदाज आहे.
आकडे बोलतात -
एकूण गाळप - 614.58 लाख टन
साखर उत्पादन - 66.10 लाख टन
साखर उतारा - 10.75
पुणे विभाग - 241.36 लाख टन गाळप, साखर उत्पादन- 25.85 लाख टन
कोल्हापूर विभाग - 148.51 लाख टन गाळप, साखर- 18.72 लाख
नगर विभाग - 86.12 लाख टन गाळप, साखर- 8.82 लाख टन
औरंगाबाद विभाग - 53.69 लाख टन, साखर- 4.98 लाख टन
नांदेड विभाग - 76.39 लाख टन, साखर- 7.78 लाख टन
अमरावती विभाग - 4.40 लाख टन, साखर- 46 हजार टन
नागपूर विभाग - 4.11 लाख टन, साखर- 39 हजार टन
|