पंढरीत चैत्री वारीमध्ये राजकीय फीवर

पंढरपूर - येथील मठात वृत्तपत्राचे वाचन करीत राजकीय चर्चेत सहभागी झालेले वारकरी.
पंढरपूर - येथील मठात वृत्तपत्राचे वाचन करीत राजकीय चर्चेत सहभागी झालेले वारकरी.

पंढरपूर - चैत्री यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांमध्ये देखील निवडणुकीचा ज्वर दिसून येतोय. विविध मठांमधून हरिनामाच्या जयघोषानंतर राजकीय चर्चा रंगत आहे. कोणी देशाच्या विकासासाठी मोदी सरकारच परत आले पाहिजे, असे म्हणत आहेत; तर कोणी खोटी आश्‍वासने देणारे मोदी सरकार पुन्हा नको, असे ठामपणे सांगत आहेत.

‘सकाळ’ प्रतिनिधीने आज येथील संत मुक्ताबाई मठात मुक्कामास असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.

राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती आहे. परंतु तरीदेखील पंढरीची चैत्री वारी चुकू नये, यासाठी अनेक जिल्ह्यांतून शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने आले आहेत. हरिनामाच्या जयघोषानंतर काही वेळ विश्रांती घेत बसलेल्या वारकऱ्यांना निवडणुकीविषयी बोलते केले. काही शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली, तर काही जणांनी भाजप देशाला विकासाच्या दिशेने नेत असल्याची भावना व्यक्त केली. काही चतुर वारकऱ्यांनी मात्र कशाला ओढता आम्हाला राजकारणाच्या फंदात, असे म्हणून स्पष्ट बोलणे टाळले.

मोदींचे सरकार फसवे आहे. त्यांनी उद्योगपतींना मदत केली; परंतु शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या सरकारला धडा शिकवला पाहिजे.
- गणेश शेळके, रा. कागल, जि. कोल्हापूर 

मोदींच्या काळात भ्रष्टाचार कमी झाला. कर्जमाफी जशी महत्त्वाची आहे, तशीच देशाची प्रगतीही महत्त्वाची आहे. त्यामुळे पुन्हा मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत.
- दिलीप कुणकेकर, रा. कोल्हापूर

काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून मागील वेळी भाजपला मते दिली; परंतु भाजपने आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना पक्षात घेतले आहे. मग यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला. पूर्वीची काँग्रेसच आम्हाला बरी होती, असे वाटायला लागले आहे.
- संपत तात्या पाटील, रा. जुन्नर, जि. पुणे

मोदींनी दिलेल्या आश्‍वासनांपैकी कोणतीही ठोस कामे झालेली नाहीत. केवळ घोषणाबाजी करणारे हे सरकार आहे. मागच्या वेळी आम्ही अशा घोषणांना फसून मते दिली होती. यंदा फसायचे नाही, असे ठरवले आहे.
- शंकर सदाशिव जाधव, रा. सासवड, जि. पुणे

या सरकारने आमच्यासारख्या गरिबांना मोफत धान्य योजना राबवली. गरिबांना घरे बांधून दिली. त्यामुळे हेच सरकार परत आले पाहिजे, असे वाटते.
- तुकाराम खंडू पवार, रा. अक्कोळ, जि. बेळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com