पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्मिणीला अनेक भाविकांनी सोन्या-चांदीचे दागिने दान म्हणून अर्पण केले आहेत. तेच दागिने वितळवून आता त्याच्या विटा तयार करण्याचा विचार विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने सुरू केला आहे. विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी याला आज दुजोरा दिला.
विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीकडे 1985 पासून भाविकांनी दान केलेले विविध सोने-चांदीचे दागिने आहेत. यामध्ये लहान तारेपासून ते विविध अलंकारांचा समावेश आहे. गेल्या 30 वर्षांच्या काळामध्ये भाविकांनी विठ्ठल- रुक्मिणीमातेला जवळपास 30 किलो वजनाचे सोन्याचे दागिने, तर 830 किलो वजनाचे चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. हे दागिने आषाढी- कार्तिकी यात्रेसह मोठ्या सणांच्या दिवशी देवाला अलंकार म्हणून परिधान केले जातात. सोन्याचे दागिने देवाला घातल्यानंतर देवाचे रूप खुलून दिसते. या संदर्भात तत्कालीन विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीने 1973 मधील तरतुदीस अनुसरून 15 मार्च 2015 रोजी राज्य सरकारकडे सोने-चांदीचे दागिने वितळवून त्याच्या विटा तयार करण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव दिला होता, त्यावर चर्चा झाल्यानंतर विधी व न्याय खात्याने विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीला भाविकांनी सोने व चांदीचे दान म्हणून दिलेले दागिने वितळवून त्याच्या विटा तयार करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.
दागिने हाताळणे क्लिष्ट झाले
विठ्ठल- रुक्मिणीचरणी एक ग्रॅमपासून ते 50 ग्रॅम वजनापर्यंत सोन्याचे व चांदीचे दागिने दान म्हणून अर्पण केले आहेत. या दागिन्यांचा हिशेब ठेवणे व तपासणी करणेही क्लिष्ट झाले आहे. त्यातच काही दागिने नाजूक असल्याने त्यांची तूट-फूट होऊ लागली आहे. या संदर्भात नित्योपचार समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचा देखील मंदिर समितीने निर्णय घेतला आहे.
|