पंढरपूर - ऊसदर प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊ लागले आहेत. पहिली उचल जाहीर करावी आणि मगच उसाला कोयता लावावा, अशी त्यांची मागणी आहे. "स्वाभिमानी'च्या महिला कार्यकर्त्यांनी रविवारी आक्रमक भूमिका घेत शिरढोण (ता. पंढरपूर) येथील ऊसतोड बंद करून युटोपियन शुगर व विठ्ठलराव शिंदे कारखान्यांची सहा वाहने परत पाठवली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या वर्षी पहिली उचल तीन हजार 400 रुपये द्यावी, अशी मागणी केली आहे. पहिली उचल जाहीर करावी आणि मगच उसाला कोयता लावावा; अन्यथा कारखानदारांविरोधात पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा दिला आहे. पंढरपूर व परिसरातील कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. ठिकठिकाणी ऊसतोडणीसाठी वाहने व टोळ्या येऊ लागल्या आहेत.
आज शिरढोण येथे ऊसतोडणीसाठी युटोपियन शुगर व विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या मजूर टोळ्या आल्या होत्या. ऊसतोडणी सुरू झाल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख विश्रांती भुसनर यांना कळताच त्यांनी प्रत्यक्ष ऊस बागायतदारांची भेट घेऊन त्यांना ऊस तोडू न देण्याची विनंती केली. त्यांनीही विनंती मान्य करत आपली तोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
|