दुष्काळावर कायमस्वरुपी मात हवी

दुष्काळावर कायमस्वरुपी मात हवी

पुणे - राज्यात १९७२ च्या तुलनेत यंदा दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी सरकारने एक लाख कोटींचा निधी खर्च करावा. यासाठी कृतीबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाच्या वतीने करण्यात आली.

गोखले अर्थशास्त्र संस्था, सर्व्हंट्‌स ऑफ इंडिया सोसायटी आणि महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळ यांच्या वतीने येथे शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाईवर चर्चा करण्यात आली. राज्यात पेयजलाचा प्रश्न गंभीर होणार असल्यामुळे सध्याचा उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठीच राखून ठेवण्यात यावा. उसाला पाणी देऊ नये, मद्यार्क, बांधकाम आणि कागद उद्योगांचा पाणीपुरवठा थांबविण्यात यावा. रोजगाराचा प्रश्न गंभीर होणार असून, सुमारे दोन कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. कामगारांना दररोज पाचशे रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा. गरजू लोकांना मोफत शिधावाटप करावे, ग्रामीण भागातून शहरात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अन्नछत्रे सुरू करावीत. या सर्व कामांवर समन्वय ठेवण्यासाठी सरकारने देखरेख समित्या नेमाव्यात, असे ठराव बैठकीत पारित करण्यात आले. या मागण्यांबाबत एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे, असे मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच. एम. देसरडा यांनी सांगितले.

या बैठकीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत दळवी, डॉ. मारुती तेगमपुरे, डॉ. वामन साळवी, आनंदराव पाटील, सूर्यकांत पलांडे, डॉ. प्रदीप पुरंदरे, अमिताभ पावडे, अण्णा सावंत, सुभाष कापूसे, किशोर ढमाले, शकुंतला देसरडा, प्रतिमा परदेशी, सीमा कुलकर्णी यांच्यासह तज्ज्ञ, अभ्यासक या वेळी उपस्थित होते.

‘... अन्यथा संघर्ष निर्माण होईल’
सध्याचे लोकप्रतिनिधी लोकांमध्ये जात नाहीत, हे सर्वात मोठे दुःख आहे. शासकीय यंत्रणा मख्ख झाल्या आहेत. आम्ही सर्व जिल्ह्यांचे दौरे करून नागरिकांशी संवाद साधणार आहोत. गरीब जनता आणि शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आल्यानंतर सरकारने त्यांचे प्रश्न सोडविणे अपेक्षित आहे. त्यांना न्याय देण्याऐवजी सरकारने कॉर्पोरेट उद्योग क्षेत्राचे सुमारे सव्वातीन लाख कोटींचे कर्ज माफ केले. सरकारने दुष्काळ निर्मूलनाबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास संघर्ष निर्माण होईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com