अपघातातील सर्व मृतदेह बाहेर; मदतकार्य थांबले

अपघातातील सर्व मृतदेह बाहेर; मदतकार्य थांबले

महाड - पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावरील आंबेनळी घाटात दाभील टोक परिसरात झालेल्या बस अपघातातील सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मदतकार्यासाठी बंद केलेली घाटातील वाहतूक 24 तासांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 

सह्याद्री ट्रेकर्स, मदत ग्रुप, सह्याद्री गिरीभ्रमण महाड, यंग ब्लड पोलादपूर आणि रात्री आलेल्या एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्व 30 मृतदेहांना बाहेर काढले. शनिवारी दिवस-रात्र आणि रविवारी सकाळी 11 पर्यंत मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात महाड-पोलादपूरमधील महसूल, पोलिस आणि आरोग्य यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आली होती. मृतदेहांची ओळख पटवून त्यानंतर तत्काळ विच्छेदन करून हे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या वेळी रुग्णालयात केवळ अश्रू आणि आक्रोश होता. हे मृत कर्मचारी आस्थापना, प्रशासन, संशोधन, शिक्षण, बांधकाम, वनस्पतीशास्त्र अशा विविध विभागांत अधीक्षक, लिपिक, सहायक अधीक्षक, लेखा शाखा, कॅशिअर, स्वीय सहायक अशा पदांवर काम पाहत होते. सात जणांनी वेगवेगळ्या कारणांमुळे या सहलीला येणे टाळले. आपण वाचलो याचा आनंद तर सहकारी गमावल्याचे दु:ख त्यांना पचवणे कठीण जात असल्याचे पाहायला मिळत होते. 

घाट शांत झाला 
महाबळेश्‍वर घाटात धबधब्यावर आंघोळ करणाऱ्यांचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा असतो. शनिवारी घडलेल्या दुर्घटनेने मात्र हा घाट शांत झाला. वाहणाऱ्या धबधब्यांचा आवाज कानावर येत असला तरी माणसांचा उत्साह पार निघून गेल्याचे दिसून येत होते. अवघ्या काही मिनिटांपूर्वीच एका धबधब्यावर थांबून पुढे निघालेल्या दापोलीच्या या कर्मचाऱ्यांच्या बसला काळाने गाठले होते. 

घाटातील वाहतूक सुरू 
शनिवारी घटना घडल्यानंतर मदत कार्यासाठी हा मार्ग बंद करण्यात आला होता. क्रेन रस्त्यात उभी असल्याने अन्य वाहने जाणे-येणे शक्‍य नव्हते. मृतदेह काढण्याचे काम रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत पूर्ण झाले. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास हा मार्ग वाहतुकीस सुरू करण्यात आला. एनडीआरएफचे जवान आणि ट्रेकर्स यांना या मोहिमेदरम्यान लागणारे अन्न- पाणी विविध संस्था आणि राजकीय पदाधिकारी यांनी पोचवले. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि महाडचे आमदार भरत गोगावले, दापोलीचे आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते. 

वारसांना सेवेत घेणार 
आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आपले सर्वस्व गमावलेल्या दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेतले जाईल, असे रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत सांगितले. सरकारकडून जाहीर करण्यात आलेली 4 लाख रुपयांची मदत महसूल विभागाकडून सोमवारी सायंकाळपर्यंत दिली जाईल. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 हजारांची मदत वैयक्तिरित्या दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com