मुंबई - न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर आता त्याच्या आत्महत्येचा खोटा गुन्हा दाखल केल्याने विरोधी पक्षाचे नेते संतापले आहेत. पोलिसांच्या या बेफिकिरीबद्दल जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाणे गाठले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह डझनभर आमदारांचा यांत समावेश होता. खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल या नेत्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन संबंधित शेतकऱ्याची भेट घेतली. या नेत्यांनाही पोलिस चुकीची माहिती देत होते.
शेतकऱ्याला पोलिस ठाण्याच्या एका खोलीत बसवलेले असताना त्याला न्यायालयात नेले असल्याचे पोलिस सांगत होते.
अजित पवारांनी लावला छडा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी स्वतः दूरध्वनीवरून शेतकऱ्याशी संवाद साधून शहानिशा केली. त्या वेळी शेतकरी पोलिस ठाण्यात आहे हे समजले. यानंतर अजित पवार पोलिस निरीक्षकावर संतापले. आम्ही शेतकऱ्यासाठी न्याय मागायला येथे येतो. तुम्ही आम्हाला खोटी माहिती कशी देता..? सरकार कोणाचेही असेल, पण ही कुठली पद्धत, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केला. शेतकऱ्याची बाजू ऐकून "एफआयआर' दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली.
शेतकऱ्याची मागणी
दोन वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीमध्ये भुसारे (मु. पो. घाटशेंद्रा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांचे मोठे नुकसान झाले. इतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली; मात्र आपल्याला अद्याप भरपाई मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी सरकारकडे केली होती. मात्र, दोन वर्षे पाठपुरावा करूनही कोणीच दखल घेत नसल्याने भुसारे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायचे ठरवले. त्यासाठी ते गुरुवारी (ता. 23) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच सुरक्षारक्षकांनी आपल्याला मुख्यमंत्री कार्यालयापासून मारहाण करीत जबरदस्तीने मंत्रालयाच्या बाहेर नेल्याचे भुसारे यांनी "सकाळ'ला सांगितले.
|