
Shahaji Patil : संजय राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका; शहाजी पाटलांची झणझणीत टीका
मुंबईः सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्याचं राजकारण तापलं आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदे सरकारला कुठलाही धक्का या निर्णयाने लागला नाही. याचसंदर्भात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रकरणी घडलेल्या अनेक घडामोडींवर ताशेरे ओढले आहेत पण महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार वाचलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने आपण त्या सत्तांतराच्या घडामोडींमधून आधीचे सरकार वाचवू शकत नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार? त्यांच्या हातात कोणत्या गोष्टी आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सत्तासंघर्षानंतर संजय राऊत यांनी सरकार बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. शहाजी पाटील यांनी संजय राऊतांना सणसणीत टोला लगावला. ते म्हणाले की, राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरच महाराष्ट्र शांत होईल असा उपोधिक टोला त्यांनी लगावला.
शहाजी पाटील पुढे म्हणाले की, संजय राऊतांना शांत केलं नाही तर ते महाराष्ट्राला शांत राहू देणार नाहीत. ते आमच्यावर तुटून पडतेत, शरद पवारांवर तुटून पडतेत अन् फडणवीसांवरही तुटून पडतेत. महाराष्ट्राचा मालक होऊन बसलेत. रोज सकाळी उठसुट कुणाचाही समाचार घेतात. आता मलाच त्यांचा शाब्दिक समाचार घ्यावा लागेल, असं पाटील म्हणाले.
त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा शहाजी पाटील आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक बघायला मिळेल, हे नक्की.