मुंबई - पुराचे पाणी अद्यापही निचरा न झाल्याने थांबले आहे, ते जाईपर्यंत प्रशासन सांगेल त्याप्रमाणे मदत करण्यात येईल. अशा परिस्थितीत श्रेय घेण्याचा विषय नाही, तर पूरग्रस्तांना मदत करणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी शिवसाह्य योजना सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकारला या परिस्थितीत सर्वांनीच मदत करायला हवी, असेही ते म्हणाले. माणसांना मदत करतानाच पशुधनासाठीही मदत देण्यात येणार आहे. गरजूंनी हाक द्यावी, शिवसेना मदत द्यायला तयार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. सांगली, कोल्हापुरातील प्रशासनाला विचारून योग्य ती मदत दिली जाईल. वैद्यकीय पथकेही पाठवली जाणार असून, पुरात अडकलेल्यांना मदत, औषधे पुरवणे हा प्राधान्यक्रम असल्याचे उद्योगमंत्री ज्येष्ठ सेनानेते सुभाष देसाई यांनी सांगितले. प्रभावित क्षेत्रातील सर्व आमदारांची आज सेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली.
|