मुंबई - कोचिंग क्लासचे (खासगी शिकवणी) मालक व विनोद तावडे यांच्यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप करीत, खासगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो दीड वर्षापासून का मंजूर केला जात नाही ? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केला.
सुरतमध्ये खासगी शिकवणी वर्गात लागलेल्या आगीत 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासगी शिकवणी वर्गांच्या परिस्थितीवर देशमुख बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खासगी शिकवणी वर्गावर काही निर्बंध लादणारा मसुदा राज्य सरकारने तयार केला आहे. मात्र, डिसेंबर 2018 पासून हा मसुदा तावडे यांच्याकडे पडून आहे. 2017 मध्ये खासगी कोचिंग क्लाससंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली होती. हा मसुदा 12 सदस्यांच्या समितीने तयार केला होता. 2018 मध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे हा मसुदा पाठवला होता. मात्र, कोचिंग क्लासचे मालक व परंतु शिक्षणमंत्री यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय असून, त्यामुळेच या मसुद्याचे कायद्यात रूपांतर केले नाही, असा आरोप देशमुख यांनी केला.
विनोद तावडे यांनी लवकरात लवकर नवीन कायदा तयार करू, असे आश्वासन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खासगी शिकवणी मसुद्याला तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली. महाराष्ट्रात एक लाख 10 हजारांपेक्षा जास्त कोचिंग क्लास आहेत. त्यामध्ये मुंबईत 30 ते 35 हजार कोचिंग क्लास आहेत. त्यांचे "फायर ऑडिट' होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या शिकवणी वर्गांवर कोणतेही निर्बंध नाही. कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत, असा आरोपही देशमुख यांनी केला.
|