मुंबई - भाजप- शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही ठोस काम केले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाचे बिगुल वाजवले. सर्वच क्षेत्रांत जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या युती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे बहिष्कार टाकला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी सरकारच्या पाच वर्षांतील कारभाराचा लेखाजोखा मांडत विधिमंडळ अधिवेशनात सरकारची कोंडी करणारे मुद्दे उपस्थित केले जातील, अशी घोषणा विरोधकांनी केली.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, की १७ जून हा ‘दुष्काळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्यात येईल. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये देण्याची मागणी या अधिवेशनातही लावून धरण्यात येईल. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा फक्त आभास निर्माण करण्यात आला होता, असेही मुंडे म्हणाले. १२०० कोटी रुपयांच्या एफएसआय गैरव्यवहारप्रकरणी प्रकाश महेता यांना केवळ मंत्रिमंडळातून काढून काहीही होणार नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
राज्याला हवा स्वतंत्र गृहमंत्री
काही मंत्र्यांना आज मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या दीड डझन मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी काढायला हवे होते.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.