...तर महाराष्ट्राचे वाळवंट होईल - चव्हाण

टिळक स्मारक मंदिर - डॉ. राजेंद्र सिंह यांना राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान करताना पृथ्वीराज चव्हाण. या वेळी राजेंद्र धारिया आणि सुरेश मेहता.
टिळक स्मारक मंदिर - डॉ. राजेंद्र सिंह यांना राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान करताना पृथ्वीराज चव्हाण. या वेळी राजेंद्र धारिया आणि सुरेश मेहता.

पुणे - ‘‘दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्प पुरेसा नाही. मोठी धरणे ही फक्त टक्केवारी व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आहेत. त्यांची कामे कधीच पूर्ण होत नाहीत. जलसंधारणाबरोबरच पाण्याचे कायमस्वरूपी शास्त्रीय पद्धतीने नियोजन केले नाहीत, तर महाराष्ट्राचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही,’’ अशी भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. ‘जलयुक्त शिवार अशास्त्रीय असून, त्याचे व्यापारीकरण झाले आहे, अशी टीकाही त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर केली.

चारित्र्य प्रतिष्ठानचा ‘राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार’ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांना चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. ‘वनराई’चे अध्यक्ष राजेंद्र धारिया, पुणे पीपल्स सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष सुभाष नढे, किशोर धारिया, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सुरेश मेहता, उपाध्यक्ष श्रीधर गायकवाड उपस्थित होते. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार’ देण्यात आला.

राजेंद्र सिंह यांच्या कार्याचे कौतुक करून चव्हाण म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे असूनही सिंचन क्षेत्र सर्वांत कमी आहे. कितीही मोठी धरणे बांधली, तरी महाराष्ट्राचे सिंचन क्षेत्र २७ टक्‍क्‍यांच्या पुढे जाणार नाही. आम्ही साखळी बंधारे बांधून नाले पुनरुज्जीवित केले. परिणामी भूजलसाठ्यात वाढ झाली. याउलट ‘जलयुक्त शिवार’मध्ये फक्त खोलीकरण झाले. त्याचा पुनर्विचार केला पाहिजे.’’ राजेंद्र सिंह म्हणाले, ‘‘पाण्याच्या समस्येमुळे जगातील स्थलांतर वाढले आहे. हीच परिस्थिती आपल्याकडे आहे. सर्वाधिक पाऊस असलेल्या पालघरसारख्या ठिकाणी स्थलांतर वाढले. जलसंधारणासाठी प्रयत्न झाले नाही, तर सीरियाच्या दिशेने आपली वाटचाल होईल.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक खोटारडे व्यक्ती आहेत. मोदींनी गंगेच्या स्वच्छतेसाठी २००० कोटींचे बजेट ठेवले. त्यापैकी दोन टक्केही पैसे खर्च झाले नाहीत. याउलट पंतप्रधान कार्यालय कामकाजमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी गंगेच्या स्वच्छतेसाठी हजारो कोटी रुपये दिले.
- डॉ. राजेंद्र सिंह, जलतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com