पुणे - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांत खोटारडे व्यक्ती आहेत. वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या मोदी यांनी गंगा स्वच्छतेसाठी दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. मात्र त्यातील दोन टक्केदेखील आतापर्यंत खर्च केलेले नाहीत,' अशी टीका जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी आज केली.
पुण्यात एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राजेंद्रसिंह यांना पुरस्कार देण्यात आला. या वेळी ते बोलत होते. गेल्या साडेतीन वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी केवळ खोटे बोलण्याचे काम केले आहे. याउलट गंगेच्या स्वच्छतेसाठी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक काम पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालय कामकाजमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असताना केले आहे, अशी आठवण राजेंद्रसिंह यांनी सांगितली. या साऱ्याच्या उलट सध्या मोदी सरकारचा अनुभव आहे. मोठ्या योजनांची घोषणा आणि प्रत्यक्षात शून्य काम अशी या सरकारची स्थिती आहे. लोकांना फसविण्याचे काम पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारमार्फत चालू असल्याची टीका राजेंद्रसिंह यांनी केली.
याच कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदी; तसेच राज्य सरकारवर कडाडून टीका केली. मोदी सरकारने न केलेल्या कामांची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न चालवला आहे. आम्ही केलेल्या कामांची किमान प्रसिद्धीदेखील मिळवू शकलो नाही. याबाबतीत आमचे जरा चुकलेच, या शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
|