नागपूर - राज्यातील विविध उद्योग कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तू व सेवा करामुळे राज्याच्या प्रोत्साहन योजनेत येणाऱ्या अडचणी मांडल्या. जीएसटीमुळे राज्य सरकारच्या प्रोत्साहन योजनेत कोणतेही नुकसान होणार नाही, त्यासाठी जीएसटी कौन्सिलसमोर उद्योगांचे प्रश्न मांडू, असे आश्वासन फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिले.
केंद्र शासनाच्या वस्तू व सेवा करामुळे उद्योगांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारी प्रोत्साहन योजना सुरू ठेवणे आणि त्यातील परतावा रकमेच्या हिश्श्यासंदर्भात या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी टाटा मोटर्सचे सुशांत नाईक, राजेश शुक्ला, महिंद्रा कंपनीचे भारत मोसद्दी, तुषार गद्रे, मर्सिडीजचे अनंतरामन टी. बलराम प्रधान, फियाट कंपनीचे आकाश मित्तल, वोक्सवॅगनचे पंकज गुप्ता, सियामचे सुगातो सेन, जयेश सुळे आदी उपस्थित होते.
जीएसटीमुळे राज्य शासनाच्या प्रोत्साहन योजनेतून उद्योगांना मिळणारा परतावा कमी होणार आहे, त्यामुळे उद्योगांचे नुकसान होणार असल्याचे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले. यावर फडणवीस म्हणाले, की हा सगळ्या राज्यांचा प्रश्न आहे. उद्योगांच्या स्पर्धात्मक वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून राज्य शासन कर परतावा देत आहे. जीएसटीमुळे या योजनेत सहभागी होणाऱ्या उद्योगांचे नुकसान होऊ नये यासाठी निश्चित प्रयत्न करू. या समस्येतून राज्य शासनाकडून नक्की मार्ग काढण्यात येईल. या संदर्भात राज्य शासन वेगळे मॉडेल तयार करेल. उद्योगमंत्री देसाई यांनी या वेळी प्रोत्साहन योजनेची माहिती दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.