राहाता - 'आम्ही कॉंग्रेसला प्रोत्साहन देत नाही; मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते ज्यांना पप्पू म्हणून हिणवायचे, त्या खासदार राहुल गांधी यांनी गुजरात निवडणुकीत चांगली कामगिरी केली. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी व अल्पेश ठाकोर या तीन तरुणांनी तेथील वातावरण बदलून टाकले.
भाजपचे विविध राज्यांचे मुख्यमंत्री व संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा धडाका लावला, तरीही अपेक्षित यश मिळाले नाही. मोदी लाटेला तेथे ओहोटी लागली,'' अशा शब्दांत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पक्षकार्यकर्त्यांसमोर गुजरात निवडणुकीचे विश्लेषण केले.
ठाकरे यांनी आज येथे पक्षकार्यकर्ते व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, 'पुढील महिन्यात पक्षबांधणीसाठी आपण नगर जिल्ह्याचा दौरा करणार आहोत. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या समस्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या संबंधित मंत्र्यांसोबत स्वतः संपर्क साधू.''
'आपला शिर्डी दौरा शाळकरी मुलांसोबत संवाद साधण्यासाठी आहे. त्यामुळे आपण राजकीय टीका-टिप्पणी करणार नाही. गुजरातच्या निवडणुकीबाबत आपण ट्विट केले तेवढे पुरेसे आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेबाबत काही बोलू इच्छित नाही,'' असे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
|