संगमेश्‍वर - आठवडा  बाजारात घुसलेले पुराचे पाणी.
संगमेश्‍वर - आठवडा बाजारात घुसलेले पुराचे पाणी.

कोकण, नाशिकमध्ये मुसळधार

पावसामुळे विदर्भातील १४० गावांचा संपर्क तुटला 
मुंबई - जोरदार पावसाने सोमवारी कोकण आणि साताऱ्याला झोडपून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात नद्यांचे पाणी घुसल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिकमधील गोदावरीतून पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १०० आणि अमरावती जिल्ह्यातील ४० गावांचा संपर्क तुटला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रविवारी रात्री १०.३० वाजता परशुराम पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.

दक्षिण राजस्थान ते ओडिशादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राजस्थानपासून मध्य प्रदेश, ओडिशापर्यंतच्या मध्य भारतात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातदेखील पाऊस झाला आहे; मात्र मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

गेल्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत संपूर्ण कोकणात सर्वदूर जोरदार पाऊस झाला; मात्र मागील दोन दिवसांच्या मानाने पावसाचे हे प्रमाण कमी झाले होते. मध्य महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भात पाऊस पडत आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्‍यता आहे, असे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी सांगितले.

सोमवारी दिवसभरात परभणी येथे ४० मि.मी. पावसाची नोंद झाली असून महाबळेश्‍वर ९०, रत्नागिरी १३, नाशिक १६, सातारा २६, अमरावती २३, चंद्रपूर ३९, ब्रह्मपुरी १५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ३० जुलै रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार; तर कोकण, गोवा मुसळधार पाऊस. ३१ जुलैला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात आज पाऊस
३० जुलै रोजी लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये पुढील चारही दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे व मुंबई या कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार; तर २ ऑगस्ट रोजी या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com