मुंबई - विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपुरात, हा तिढा सुटला असून हे अधिवेशन नागपुरात होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या चार जुलैपासून हे अधिवेशन सुरू होणार असून, तीन आठवडे इतके कामकाज होणार आहे. यासाठी विधिमंडळाचे, तसेच मंत्रिमंडळ आस्थापनावरील अधिकारी- कर्मचारी यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बहुतांश मुंबईतच पार पाडले जाते. मात्र, यंदाचे अधिवेशन नागपुरात घेण्याविषयी सत्ताधारी पक्षाकडून वारंवार विधाने केली जात आहेत. यातच विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली तरीही ते नेमके कोठे पार पाडले जावे याबाबत ठोस निर्णय होत नव्हता. नागपूर येथे पावसाळी अधिवेशन घेतले जावे, याबाबत सत्ताधारी शिवसेना राजी नाही, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यास विरोध होता. मात्र, अलीकडे ठाकरे यांचा विरोध मावळला आहे, त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपुरातच पार पाडले जाईल, हा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी हे प्रवासाचे आरक्षण, विमान तिकिटे याची चौकशी करीत आहेत. विधिमंडळ अधिकाऱ्यांना नागपूर येथे पाठवून प्राथमिक पाहणी करण्यास सांगितले आहे.
|