
Raj Thackeray : एका रात्रीत माहिम, सांगलीच्या दर्ग्यांवर कारवाई; मनसे अध्यक्षांनी पुन्हा लिहिलं पत्र
राज ठाकरे यांची गुढीपाडवा मेळाव्यापासून चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी या मेळाव्यामध्ये सांगली आणि माहिम इथल्या अनधिकृत दर्ग्याचा विषय मांडला आणि त्यानंतर प्रशासनाने त्यावर तात्काळ कारवाई केली. त्याबद्दल राज ठाकरे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त, सांगलीचे मनपा आयुक्त जिल्हाधिकारी या सगळ्यांचे आभार मानले आहेत. यासाठी त्यांनी ट्वीटरवर एक छोटं पत्रही लिहिलं आहे. तसेच असे प्रकार घडू नयेत यासाठी शासन प्रशासनासोबत प्रत्येक हिंदूने जागरुक राहायला हवं, असं आवाहनही केलं आहे.
आपल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, "धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला."
"तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त श्री. इक्बाल चेहेल ,सांगली मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो."
"आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं", असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.