
Raj Thackeray : '...म्हणून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला, अजित पवारांना आतून उकळ्या फुटत होत्या'
रत्नागिरीः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरी येथे सभा होत आहे. या सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
राज ठाकरे म्हणाले की, मागच्या काही दिवसांपासून कोण कुठल्या पक्षात आहे , हे लक्षातच येत नाही. शरद पवारांच्या राजीनाम्याचा गोंधळ सुरु होता, तो काल संपला. खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता? राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत.. तू गप्प बस, तू शांत बस, माईक हातातून घे.
'पवार साहेब म्हणाले असतील, मी आत्ता राजीनामा दिला तर हा माणूस असा वागतोय. उद्या मलाही गप्प बसायला लावेल. त्यामुळेच पवार साहेबांना राजीनामा मागे घेतला असेल. खरं तर अजित पवारांना आतून उकळ्या फुटत होत्या, होतंय ते बरं होतंय असं अजित पवारांना वाटत होतं.' असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, मी सांगितलं होतं, काकांकडे लक्ष द्या. ते कधी कोणती गोष्ट करतील याचा नेम नाही. पण तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, आपल्याला काही घेणंदेणं नाही असं म्हणून त्यांनी कोकणाच्या प्रश्नांना हात घातला.
राज ठाकरे पुढे म्हणाले, कोकणातील माणसांचे मला काहीच कळत नाही. तुमच्या जमिनी कोणीतरी विकत घेताहेत हे लक्षात कसे येत नाही. बाहेरुन माणसं येतात आणि ते प्रकल्पाची सुरुवात करतात. नाणारनंतर बारसूचे नाव आले. तुम्हाला हे कळलं कसं नाही. तुमच्या जमिनी विकल्या गेल्या हे कसं?
आपली जमीन गेली हे कसं कळत नाही. कवडीमोल भाव देऊन तुमच्या जमिनी घेतात आणि मोठ्या भावानं सरकारला विकतात. कोकणासारखा प्रतिभासंपन्न भाग पण त्याची अवस्था बिकट झाली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.