'एकदा बोललात माफ केलं; पण यापुढं तुम्हाला सुट्टी मिळणार नाही.'
फलटण शहर (सातारा) : जिल्ह्याला दिशाहीन राजकारण परवडणारं नाही. जिल्ह्यात मोकाट सुटलेल्या दोन जनावरांना थारा देऊ नका. मी महाचतुर आहे. मी आहे तोवर निर्बुद्ध खासदार व नीतिभ्रष्ट जिल्हाध्यक्ष हे जिल्ह्यात स्वतःचा प्रकाश पाडू शकणार नाहीत, हा आपला शब्द आहे. जिल्ह्याला विकासाची दिशा देणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांना ताकद देऊन त्यांच्या पाठीशी राहणे हे आपणा सर्वांच कर्तव्य आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील (Phaltan-Koregaon Assembly Constituency) जनसंपर्क अभियान मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil), आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, दीपकराव चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, शिवरुपराजे खर्डेकर, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, महादेवराव पवार, तेजस शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रामराजे यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आक्रमकपणे टीका केली.
स्वतःला उद्योगपती समजणाऱ्यांनी कोरेगावला रामराजे किती नालायक आहेत, हे सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ताकदीवर कॉरिडॉर मंजूर करून घ्या, असा टोला लगावत खासदार निंबाळकर यांनी उपळवेचा कारखाना हलवून म्हसवडला काढावा व चालवून दाखवावा हे आपले त्यांना उघड आव्हान आहे, असे सांगत रामराजे म्हणाले, ‘‘माढ्याचा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे निवडून आला; परंतु आमदार गोरे म्हणतात हा खासदार मीच निवडून आणला, जर जयकुमार गोरेंनीच सगळे केले तर मग खासदार रणजितसिंह काय करतात. त्यांची बॕग घेऊन चालतात का?’’
हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या पक्षातील खासदार व जिल्हाध्यक्षांच्या टोळीने आपणास हिंदुत्व हा शब्द लिहून दाखवावा, असा टोला लगावून रामराजे म्हणाले, ‘‘माझ्या नादाला न लागलेलेच बरं कारण तुमच्याकडे ईडी आहे, तर माझ्याकडे सीडी आहे. खासदार म्हणतात, मी रेल्वे आणली; परंतु ती चालते का? अशी खिल्ली उडवत खासदार व जिल्हाध्यक्षांच नात हे वटसावित्रीच आहे. ते न तुटावं असा आपला प्रेमळ आशीर्वाद असून, आपला संसार सुखाचा होवो; परंतु त्यामध्ये फलटण तालुका घेऊ नये. एकदा बोललात माफ केले; पण यापुढे तुम्हाला सुट्टी मिळणार नाही, असा इशारा रामराजे यांनी दिला. जिल्ह्याची उज्ज्वल परंपरा जाऊ देऊ नका, असे आवाहन करीत जिल्ह्याला शरद पवार यांच्या आशीर्वादाने विकासाची दिशा लाभली आहे. हा आशीर्वाद कायम ठेऊन त्यांना ताकद देणे व त्यांच्याबरोबर राहाणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.’’कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा, तालुका व शहरस्तरीय पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक व विविध गावचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.