मुंबई - 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, रत्नागिरी- सिंधुदुर्गमधून लोकसभा मतदारसंघातून नीलेश राणेच आमच्या पक्षाचे उमेदवार असतील, अशी घोषणा अध्यक्ष नारायण राणे यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जवान हुतात्मा झाल्यामुळे अवघा देश स्तब्ध असताना सत्ता, स्वार्थाच्या तडजोडीसाठी युतीच्या बैठका सुरू होत्या, असा हल्लाबोल राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज मुंबईत झाला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नीलेश राणे पक्षाचे उमेदवार असतील. त्याचबरोबर राज्यातील इतर काही जागांवर निवडणूक लढू, असे राणे यांनी जाहीर केले. युतीतील काही जणांना माझ्या नावाची कावीळ झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
माणसाला बाजूला करायचे आणि कंपन्यांबरोबर तडजोडी करायच्या, हा धंदा शिवसेनेने मराठी माणसासाठी नाही; तर पैशांसाठी केला, असा आरोप राणे यांनी केला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपटावरूनही त्यांनी शिवसेनेवर टीका केली. पैशांसाठी बाळासाहेबांचा वापर करू नका, असा हल्ला त्यांनी चढवला. भाजप-शिवसेना युती झाल्यास राणे यांच्या पक्षाला कोकणातील लोकसभेची जागा मिळणार नाही, असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर युतीबाबत चर्चा सुरू झाल्यामुळे राणे अधिक आक्रमक झाले आहेत.
मुंबईतील मराठी माणसाच्या जीवावर तुम्ही तुडुंब झाला; मग मुंबईतील मराठी टक्का कमी कसा झाला?
- नारायण राणे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष.
|