भाजपमधील गृहयुद्धाचा पुन्हा पेटला वणवा 

भाजपमधील गृहयुद्धाचा पुन्हा पेटला वणवा 

जळगाव :राज्यातील सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे भारतीय जनता पक्षाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. पक्षातील हे अंतर्गत वाद सत्ता जाताच आता उघड्यावर येत आहेत. जळगाव जिल्ह्यात तर पक्ष सत्तेत असतानापासूनच अंतर्गत धुसफूस होती. त्याचा आता वणवा होत आहे. तो पक्ष फुटूनच विझणार, की पक्षनेतृत्व तो शमविण्यात यशस्वी ठरणार, याकडेच आता लक्ष असणार आहे. 


पाच वर्षांपूर्वी भाजपची राज्यात सत्ता आल्यावर पक्षाला अधिकच चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता आल्यावर उलटेच झाले. राज्याच्या सत्ताकारणाच्या स्पर्धेत पक्षातील नेतृत्व असलेले एकनाथराव खडसे यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्यावर झालेल्या गैरव्यवहारांच्या आरोपाचे कारण देऊन त्यांना मंत्रिमंडळातून दूर करण्यात आले. त्यानंतरच पक्षात वादाला सुरवात झाली. त्या अगोदरच जळगाव जिल्ह्यात पक्षातील जिल्हा नेतृत्वाचा वाद सुरू झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले गिरीश महाजन यांना आपले नेतृत्व सिद्ध करावयाचे असल्याने त्यांनी खडसे यांना मंत्रिमंडळातून दूर करण्यासाठी हातभार लावल्याचा संशय खडसेंसह त्यांच्या समर्थकांनाही येऊ लागला. त्यामुळे एकसंध असलेल्या जळगाव जिल्हा भाजपत अंतर्गत वादाची धुसफुस सुरू झाली. परिणामी महाजन व खडसे यांचे सरळ दोन गट पडले. 

प्रदेशच्या नेत्यांनाही याबाबतची माहिती होतीच. त्यावेळी त्यांनी जळगावात पालकमंत्रिपदी चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या दबावामुळे हा अंतर्गत वाद मिटेल, असे वाटले होते. मात्र या ठिकाणीही झाले उलटेच... दादांकडून वाद मिटलेच नाहीत. उलट त्यांचा "तिसरा'गट तयार झाला, त्यामुळे अधिकच तिढा निर्माण झाला. पुढे हे वाद अधिकच वाढत गेले आणि "पार्टी वुईथ डिफरन्स'चा बुरखा टराटरा फाटू लागला. तरीही पक्षनेत्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. विधानसभा निवडणुकीत सांधण्याऐवजी फाटण्यासाठीच नेतृत्वाने "रसद' पुरविल्याचे म्हटले जात आहे. श्री. खडसे यांनी मुक्ताईनगरातून उमेदवारी मागितली. अगदी पक्षाच्या उमेदवारीचा अर्जही दाखल केला. मात्र, त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. परंतु त्यांनी पक्षाविरुद्ध आवाज उठविल्याने त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. पण, त्यांचाही पराभव झाला. गेल्या तीस वर्षांनंतर प्रथमच या मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला. हा पराभवही पक्षातील हितशत्रूंनी विरोधी उमेदवारांचा सर्व "रसद' पुरवून घडवून आणला, असा आरोप खडसे यांनी केला. 

मुक्ताईनगरमध्ये ऍड. रोहिणी खडसे व परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या झालेल्या पराभवामुळे भाजपत अंतर्गत वादाचे पाणी मुरू लागले. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाबाबत आतापर्यंत सर्वच गप्प होते. मात्र, पक्षाच्या हातून राज्यातील सत्ता जाताच अंतर्गत वाद उफाळून वर आले. पंकजा मुंडे यांनी आपली पक्षातील अस्वस्थता एका ट्‌विटद्वारे व्यक्त केली आणि वादाला तोंड फुटले. श्री. खडसे अगोदरच नाराज होते. त्याबाबत ते वेळोवेळी आवाज उठवीत होते. मात्र ते एकटेच असल्याने त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. परंतु आता पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, प्रकाश मेहता, या पक्षातील नेत्यांनी खुलेपणाने बोलणे सुरू केले. त्यामुळे खडसे यांनाही बळ मिळाले. विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कारवाया करणाऱ्या हितशत्रूंची नावे त्यांनी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली असल्याचेही श्री. खडसे यांची म्हणणे आहे. खडसे यांनी कुणाविरुद्ध तक्रार केली, याबाबत आता सर्वच गुलदस्त्यात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com