नागपूर : 'सध्या शेतकऱ्यांचा संप चालू आहे, पण आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप काही केले, पण काही केल्या शेतकऱ्यांच्या समस्या कमी होत नाहीत. खतांच्या किंमती कमी केल्या, पण शेतकऱ्यांना उत्पादनाचा भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या या काही आज तयार झालेल्या नसून वर्षानुवर्षांच्या समस्यांवर आम्ही तोडगा काढतोय', असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत केले.
'पेट्रोलचे दर वाढले असेल तरी, फळे, भाज्या, धान्य व इतर गोष्टींच्या किंमती कमी झाल्या आहेत, पण ज्या वस्तूंच्या किंमती कमी झल्या आहेत, त्या न दाखवता फक्त वाढलेल्या किंमतीच माध्यमांमध्ये दाखविल्या जातात', गडकरी यांनी सांगितले. आमच्यावर संविधान बदल्याचा, तसेच जातीय व धार्मिक भावना भडकावल्याचा देखील आरोप होतोय, या खोट्या आरोपांमुळेच आम्ही निवडणूकीत हारलो. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन आमच्या समोर उभे राहिले, तरी आम्ही स्वतंत्र लढू, सत्तेत येऊ व या पुढची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्यांवर लढवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील तुरीच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
शिवसेना आम्हाला सतत विरोध करते. कर्नाटकातही काही वेगळी परिस्थिती नाही. 15 दिवस झाले, तरी कर्नाटकात मंत्रिमंडळ तयार होऊ शकले नाही. क्रिकेट आणि राजकारणात कोणी कायम मित्र आणि शत्रू नसतो. त्यामुळे निवडणुकीच्या वेळेस जागावाटप आणि नेता निवडताना विरोधकांची एकी टिकणार नाही व पुढील पंतप्रधान हे मोदीच असतील, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
देशातील रोजगार वाढत आहे, मात्र तरी बेरोजगारी कमी होताना दिसत नाहीये, कारण लोकसंख्या वाढत चाललीय आणि लोकसंख्या वाढविण्यासाठी लोक जोरात कामाला लागले आहे. तसेच पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यासाठी शेतकरीच काहीतरी करू शकतात. दोन रुपयांनी कमी प्रती लिटर बायो डिझेल आम्ही शेतकऱ्यांना आमच्या साखर कारखान्यांकडून देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
दिल्लीत 135 किलोमीटरचा रिंग रोड तयार झाल्या मुळे दिल्लीतील 41 टक्के प्रदूषण कमी झाले आहे, आता ऑड-इव्हन नंबरची गरज पडणार नाही. बाहेरच्या राज्यातून येणारी वाहतूक दिल्लीच्या बाहेरून जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.