मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "व्हीआयपी कल्चर' मोडीत काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या सरकारमधील अन्य मंत्री आणि प्रशासनातील बड्या नेत्यांनी आपल्या गाडीवरील लाल आणि अंबर दिवे उतरविण्यास सुरवात केली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशाने आज राजभवन येथे त्यांच्या शासकीय वाहनावरील लाल दिवा उतरविण्यात आला.
राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी तसेच परिवार प्रबंधक वसंत साळुंके यांच्या उपस्थितीत राज्यपालांचे वाहनचालक मोहन सिंग बिश्त यांनी राजभवनातील जलविहारसमोरील जागेत राज्यपालांच्या गाडीवरील दिवा उतरविला. विद्यासागर राव यांच्याकडे तमिळनाडूच्या राज्यपालपदाचा देखील अतिरिक्त कार्यभार असून, चेन्नई राजभवन येथे तेथील राज्यपालांचे प्रधान सचिव रमेश चंद मीणा यांनी राज्यपालांच्या वाहनावरील लाल दिवा उतरविला.
पंतप्रधानांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम निर्णयाची अंमलबजावणी केली. त्यांच्या नंतर राज्यमंत्री मंडळातील सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे अनुकरण केले. त्यानंतर आज मंत्रालयात ज्येष्ठ "आयएएस' अधिकाऱ्यांनी आपल्या गाडीवरील अंबर दिवे काढण्यास सुरवात केली.
|