मुंबई - राज्यातील नदीजोड प्रकल्पांमधील तांत्रिक अडचणी दूर करून प्रकल्पांना चालना द्यावी, असे निर्देश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. या वेळी नदीजोड प्रकल्पांसाठी दीर्घ मुदतीसाठी कमी व्याजदराने निधी उभारून प्रकल्प राबविण्याबद्दल या वेळी चर्चा करण्यात आली.
दमणगंगा-पिंजाळ, नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणार आहेत. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विपुल पाणी उपलब्धतेसाठी अभ्यास करण्याचे निर्देश दिले. तसेच, योजनांतील धरणांमुळे बाधित होणाऱ्या व्यक्तींसाठी पाणी राखीव ठेवण्यात यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, प्रकल्प सचिव सं. कृ. घाणेकर, माजी केंद्रीय संरक्षणमंत्री डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते.
नदीजोड प्रकल्पासाठी राज्य सरकारतर्फे 16 हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
- गिरीश महाजन (जलसंपदामंत्री)
|