मुंबई - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात 30 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ते डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करावे. तसेच हायब्रिड ऍन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
हायब्रिड ऍन्युईटी रस्त्यांच्या कामांचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा आढावा फडणवीस यांनी मंत्रालयात घेतला. या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेअंतर्गत 30 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट असून 14 हजार 844 किलोमीटर लांबीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापूर्वी 4452 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहेत. 6756 लांबीच्या रस्त्यांचे काम पुढील महिन्यात सुरू होणार असून, उर्वरित रस्त्यांच्या कामांना सप्टेंबरपर्यंत कार्यारंभ आदेश देऊन ऑक्टोबरपासून कामांना सुरवात करावी. ग्रामीण महाराष्ट्रात विकासाला गती देण्यासाठी हे रस्ते महत्त्वाची भूमिका बजावणार असून, डिसेंबर 2019 पूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
|