साहित्य महामंडळ आता मराठवाड्याकडे

साहित्य महामंडळ आता मराठवाड्याकडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) : साहित्य संमेलनाच्या स्वरूपातील बदलांपासून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बंद करण्यापर्यंत अनेक महत्वाचे निर्णय गेल्या तीन वर्षांत झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय लवकरच मराठवाडा साहित्य परिषदेकडे जात आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेले विश्व मराठी साहित्य संमेलन पुन्हा सुरु होणार, अशी चर्चा आत्तापासूनच साहित्य वर्तुळात रंगू लागली आहे.

दर तीन वर्षांनी साहित्य महामंडळाच्या कार्यालयाचा कारभार मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), मुंबई साहित्य संघ (मुंबई), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), विदर्भ साहित्य संघ (नागपूर) यापैकी एका संस्थेकडे जात असते. त्यानुसार विदर्भ साहित्य संघाची मुदत पुढील दोन महिन्यात संपणार आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील यवतमाळ येथे सुरु असलेले साहित्य संमेलन हे शेवटचे संमेलन आहे. याआधी बडोदा आणि डोंबिवली येथे संमेलने घेता आली.

नऊ वर्षांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेकडे साहित्य महामंडळाचे कार्यालय असताना विश्व मराठी साहित्य संमेलनाची सुरवात झाली. सॅन फ्रान्सिस्को, दुबई येथे संमेलन घेण्यात आले. टीका झाली तरी संमेलन यशस्वी करून दाखविण्यात आले.

दरम्यान, महामंडळाचे फिरते कार्यालय मुंबईकडे गेले. तेथे तिसरे संमेलन सिंगापूर झाले. त्यानंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी अंदमानमध्ये विश्व संमेलन घेतले. पण नंतर हे संमेलन बंद पडले. आता महामंडळ औरंगाबाद येथे आल्यानंतर विश्व संमेलन पुन्हा सुरु होईल, अशी चर्चा यवतमाळ साहित्य संमेलनात रंगली आहे. मात्र, या संदर्भात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले -पाटील यांनी मौन बाळगले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com