मुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाची किंमत 46 हजार कोटींवरून आता 55 हजार कोटी रुपये झाली आहे. या सुधारित किंमतीस सरकारने मान्यता दिल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
मुंबई ते नागपूर या नव्या महामार्गाची सुरवातीला 24 हजार कोटी रुपये किंमत ग्राह्य धरण्यात आली होती. त्यानंतर 14 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रकल्पाची किंमत 49 हजार 247 कोटी रुपये इतकी दर्शविण्यात आली होती. मात्र प्रकल्पाचे काम अद्यापपर्यंत सुरू झाले नसताना भूसंपादन आणि बांधकाम साहित्याच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता हीच किंमत आता 55 हजार 335 कोटी 32 लाख रुपये इतकी झाली आहे. या प्रकल्प किमतीस सरकारने मान्यता दिल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला.
मुंबई ते नागपूर हे अंतर कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी 16 पॅकेजेसमध्ये मार्च 2017 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदेला 33 कंपन्यांनी प्रतिसाद दिला, तर प्रत्यक्षात 27 कंपन्यांनी निविदा सादर केल्या. त्यानुसार या 27 पैकी तीन कंपन्या पात्र ठरल्या असून, सात कंपन्यांच्या निविदेमध्ये काही शंका असल्याने त्यांनाही पात्र ठरवत निविदेत आवश्यक त्या सुधारणा करत निविदा सादर करण्यासाठी 29 जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्याचवेळी, 16 पॅकेजमध्ये काम करावयाचे असल्याने 16 पॅकेजसाठीही निविदा सादर व्हाव्यात आणि स्पर्धा वाढावी, यादृष्टीने निविदेत बदल करत पुन्हा निविदा मागवण्यात आल्या आहेत.
वाढता वाढे...
24 हजार कोटी सुरवातीची ग्राह्य किंमत
49,247 कोटी ता. 14 जून 2018 रोजीची किंमत
55,335,32 लाख आताची किंमत
(आकडे रुपयांत)
|