मुंबई - भारतीय संविधानाला जातीयवादी शक्तीकडून असणारा संभाव्य धोका लक्षात घेता, संविधानाच्या सन्मानार्थ निघणाऱ्या "लॉंग मार्च'मुळे आजच्या तरुण पिढीमध्ये संविधानाविषयी सकारात्मक जनजागृती होत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाने संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर याकाळात कोरेगाव-भीमा ते चैत्यभूमी असा संविधान सन्मान लॉंगमार्च काढला होता. या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली सलग 11 दिवस चाललेल्या या लॉंग मार्चचे तरुणांनी ठिकठिकाणी स्वागत करून आपला सहभाग नोंदवला. या लॉंग मार्चच्या माध्यमातून जयदीप कवाडे यांनी संविधानाविषयी तरुणांमध्ये जनजागृती करीत असतानाच संविधान बदलण्याचे कारस्थान बदलवू पाहणाऱ्यांना रोखण्याची ताकद तरुण पिढीमध्येच असल्याची जाणीव करून दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी (ता. 6) चैत्यभूमी येथे या लॉंग मार्चची सांगता झाल्यानंतर कवाडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत पवार यांनी कवाडे यांचे कौतुक करताना तरुण पिढीला संविधानसाक्षर आणि संविधान काय आहे, याची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
|