सोलापूर - राज्यातील शिक्षकांची गुणवत्ता चांगली आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत चालली आहे. राज्यात विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान देण्याची आमची मागणी आहे; पण त्याबाबत सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला.
आमदार पाटील म्हणाले, ""मूल्यांकनात पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्याबाबतचे वक्तव्य शिक्षणमंत्र्यांनी विधिमंडळात केले. खरेतर याबाबत सरकार खोटे बोलत आहे. राज्यात जेवढा भ्रष्टाचार होतो, त्यापेक्षा कितीतरी कमी पटीने पैसे शिक्षकांच्या पगारासाठी लागतील. शिक्षकांना देण्यासाठी पैसे भरपूर आहेत; पण पगार देण्याची सरकारची दानत नाही. शासनाने सुरू केलेले "पवित्र' पोर्टल चांगले आहे; पण त्यापुढेही जाऊन शिक्षकांची भरती ही लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. शासनाने कोणत्याही परिस्थितीत संस्थांकडे भरतीची प्रक्रिया देऊ नये.'' राज्यात एक लाख 92 हजार डीएड, बीएडधारक आहेत, पण शासन भरती करत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
गुरुजींच्या "ब्लेझर'ला विरोधच
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना ब्लेझर सक्तीचे केले आहे, त्याबाबत विचारले असता आमदार पाटील म्हणाले, ब्लेझर वगैरे काही करण्याची गरज नाही. खरे तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
|