मुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनाची पाहणी करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. हे सर्वेक्षण उद्याच (ता. 29) पूर्ण करण्याच्या सूचना संचालनालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या 50 शाळांमध्ये पाहणी करण्यात येईल.
केंद्र सरकारने राज्यातील 50 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तरांची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारने मुख्याध्यापकांसाठी प्रश्नावली, पालकांसाठी प्रश्नावली, विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली अशा गुगल फॉर्मच्या तीन लिंक दिल्या आहेत. त्यानुसार मुख्याध्यापक, प्रत्येक शाळेतील पाच विद्यार्थी आणि पाच पालकांची मते नोंदवण्यात येणार आहेत.
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील एकूण 50 शाळांमध्ये पाहणी केली जाणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी शाळांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार मुंबई, ठाणे, नांदेड, पालघर, पुणे, नगर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड आदी शहरांतील प्रत्येकी दोन शाळांचे सर्वेक्षण करण्यात येईल. त्याचप्रमाणे अन्य जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील प्रत्येकी एका शाळेची पाहणी करण्यात येणार आहे.
|