सोलापूर - राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची अध्यायननिश्चिती करण्यासाठी मागील दोन-तीन वर्षांपासून पायाभूत चाचणी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्नित असलेल्या राज्यातील शाळांमध्ये 28 ते 31 ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने मागील दोन-तीन वर्षांपासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या अध्यापनामध्ये प्रगती व्हावी, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवला आहे. या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात देशामध्ये आपल्या राज्याचा पहिला क्रमांक यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवली आहे. त्या अनुषंगाने राज्यभर पायाभूत चाचणीचा कार्यक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांची किती शैक्षणिक प्रगती झाली आहे, कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये तो कमी पडतो हे निश्चित करणे हा या चाचणीचा उद्देश आहे.
शिक्षकांनी अतिरिक्त मदत करू नये
जास्त मार्क मिळावेत, या हेतूने शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना चाचणीपूर्वी किंवा चाचणीच्या वेळी अतिरिक्त मदत करू नये. अशा प्रकारची मदत केल्यास तो विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कच्चा आहे, हे लक्षात येणार नाही.
|