
महागाई वाढली, ती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची : शरद पवार
नांदेड : इंधन दरात तसेच खाद्यतेलाच्या वाढीमुळे देशातील किरकोळ महागाई दराने गेल्या आठ वर्षातील उच्चांक गाठला आहे. महागाई आवाक्याबाहेर जात असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे. याबाबत डाव्या आघाडीतर्फे चर्चेसाठी माझ्याकडे विचारणा झाली असून महागाईबाबत सर्वांनी एकत्र येऊन भूमिका केंद्रात घेऊ, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (ता.१४) नांदेडला (Nanded) पत्रकार परिषदेत दिली. नांदेडला पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Sharad Pawar Ask Indian Government To Control Inflation)
हेही वाचा: शांतता तेव्हाच कायम राहील, जेव्हा लोकांची... : सरन्यायाधीश रमणा
त्यानिमित्ताने दुपारी साडेचार वाजता शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार फौजिया खान, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम उपस्थित होते. इंधन, गॅस सिलेंडर, खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने महागाई वाढली असून ती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची आहे. त्यामुळे याबाबत श्री. येचुरी तसेच इतरांकडूनही विचारणा झाली असून महागाईबाबत सर्वांनी एकत्र भूमिका केंद्रात घेऊ, असे सांगितले. दरम्यान, नांदेडला अनेक वर्षापासून पोलिस आयुक्तालयाची मागणी होती. तसा प्रस्तावही प्रलंबित आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयाचा निर्णय आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर मांडू आणि अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
हेही वाचा: सहकार क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक व्यापक हवा : शरद पवार
नवीन प्रश्न निर्माण करणे योग्य नाही
औरंगाबादला एमआयएमच्या वतीने औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहण्याच्या प्रकाराबाबत विचारले असता श्री. पवार यांनी महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे आणि औरंगजेब यांनी काय केले हे माहिती आहे. त्यामुळे कारण नसताना दुसऱ्या राज्यातून येऊन शांततेत असलेल्या महाराष्ट्रात नवीन प्रश्न निर्माण करणे योग्य नसल्याचे सांगितले.
पाच वर्षे सरकार टिकेल
आघाडी सरकारवर आणि माझ्यावर आरोप करण्यात येत असले तरी सरकारला काहीही अडचण नाही. मी समाधानी असून आघाडी सरकार पाच वर्षे चालायला काहीच हरकत नाही. नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील हे सातत्याने सरकारला तारखा देत असतात. पण त्यात काही तथ्य नाही. त्यांची विधाने आता ऍन्जाय केली जातात.
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सुटेल
यंदाच्या वर्षी अतिरिक्त ऊस झाला आहे. अतिरिक्त ऊसामुळे झालेली शेतकऱ्याची आत्महत्या चिंताजनक आहे. जालना, बीड, सातारा आदी जिल्ह्यात अतिरिक्त ऊस आहे. त्या संदर्भात कारखान्यांना सूचना दिल्या असून ऊस संपल्याशिवाय कारखाने बंद करू नका, असेही राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीराजेबाबत सकारात्मक
राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात निवडणुक होत असून छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून लढणार आहेत. त्यावर महाविकास आघाडीची भूमिका काय असणार? यावर विचारले असता श्री. पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे संख्याबळ लक्षात घेता आमचा एक प्रतिनिधी निवडून येतो. शिल्लक १२ मते आहेत. शिवसेनेचाही एक निवडून येतो. त्यांचीही शिल्लक मते आहे. कॉँग्रेसही मदत करेल. काही अडचण येणार नाही. आम्ही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: "राणा आधी बारमध्ये..."; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य
निवडणुकीबाबत निर्णय घेऊ
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाआघाडी एकत्र लढवणार का? याबाबत श्री. पवार म्हणाले की, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ओबीसी जागेच्या निकालाबाबत न्यायालयाचा निर्णय आणि निवडणुक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या एकत्र लढायच्या की स्वतंत्र लढवून पुन्हा एकत्र यायचे का? आदीबाबत त्या त्या पक्षाचे अध्यक्ष व प्रमुख एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील.
महाराष्ट्रात असे कधी घडले नाही
केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि राज्यातील पक्षाची भूमिका आम्हाला योग्य वाटत नाही. मतभेद असतात पण एकमेकांसंबंधीची टोकाची भूमिका, भावना ठेवणे योग्य नाही. एका चौकटीच्या बाहेर व्यक्तीगत स्वरूप येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. यापूर्वी महाराष्ट्रात कधी असे घडले नाही. नवाब मलिक प्रवक्ते होते. २५ वर्षापूर्वीचे प्रकरण काढणे, माजी गृहमंत्री देशमुख यांच्याविरूद्ध तक्रार केलेल्या अधिकऱ्याला राज्याबाहेर आधार घ्यावा लागतो, याचा अर्थ काय काढायचा. शेजारच्या श्रीलंका किंवा पाकिस्तानात घडणाऱ्या घडामोंडीवर विचारले असता श्री. पवार यांनी भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानामुळे आपल्याकडे अशी परिस्थिती येणार नाही. नागरिकांच्या मुलभुत प्रश्नांची सोडवणुक होत नसेल तर त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात, असेही त्यांनी सांगितले.
Web Title: Sharad Pawar Ask Indian Government To Control Inflation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..