आपत्ती व्यवस्थापनात शरद पवार 'एक्स्पर्ट' : मुख्यमंत्री

killari
killari

किल्लारी : किल्लारीच्या भूकंपानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काम संकटमोचकाचेच राहिले आहे. ते आपत्ती व्यवस्थापनात 'एक्स्पर्ट' आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनावर त्यांच्याकडे एखादे पुस्तक असेल तर त्यांनी मला द्यावे. त्याचा निश्चित उपयोग केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच भूकंग्रस्तांच्या पुनर्वसनात काही प्रश्न शिल्लक राहिले आहेत. त्यात काही घरे व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाचा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल, अशी ग्वाही 
फडणवीस यांनी यावेळी दिली. तसेच जूनपर्यंत भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने लातूर व उस्मानाबाद जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

राज्य शासन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने लातूर व उस्मानाबाद जिल्हे पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने किल्लारी येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या सुजलाम सुफलाम कार्याच्या निर्धार समारंभाते ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर प्रमुख पाहुणे लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जून खोतकर, भारतीय जैन संघटनेचे वल्लभ भन्साळी, शांतीलाल मुथा आदी उपस्थित होते.

भूकंपग्रस्ताच्या पुनर्वसनात काही समस्या राहिल्या आहेत. कुटुंब मोठी झाली आहेत. या वाढीव कुटुंबाना घर किंवा प्लॉट देण्यात  येतील. ज्यांनी पुनर्वसनसाठी जमिनी दिल्या आहेत, त्यांनाही यात सामावून घेण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ. या भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्या सुरु करून सौर ऊर्जेचा त्या करीता वापर केला जाईल, असे ते म्हणाले.

जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्याची पाणी पातळी चार मिटरने वाढली आहे. या योजनेवर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण तज्ज्ञ समितीकडून अहवाल घेण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टीनेच हे काम होत आहे. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून लातूर व उस्मानाबाद जिल्हा जूनपर्यंत दुष्काळमुक् करण्यात येत आहेत. यात लोकांनी सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर काही जलतज्ज्ञ अनुकूल नाहीत. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळमुक्तीचे काम हाती घ्यावे, असा सल्ला पवार यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला.

भूकंप ही मोठी आपत्ती होती. आपण सर्वांनी धैर्याने तोंड दिले आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील या आपत्ती देशाला एक नीती ठरवण्याचे काम केले. अनेकांची येथे मदत आली. पण सामूहिक शक्तीमुळे येथे चांगले काम करता आले, असे ते म्हणाले. आता दुष्काळाचे संकट आहे. यातही लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. भारतीय जैन संघटनेने या करीता पुढाकार घेतला आहे. जलयुक्तचे हे काम करीत असताना जलतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच हे काम सुरु करावे, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com