विरोधकांकडून शिवसेना लक्ष्य

विरोधकांकडून शिवसेना लक्ष्य

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अयोध्या दौऱ्यावर विरोधकांनी आज टीकास्त्र सोडले आहे. राममंदिराचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून केंद्रातील व राज्यातील सरकार आपला अपयशी कारभार झाकण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस अयोद्धा दौऱ्यावर होते. येथे उद्धव यांनी पत्रकार परिषद घेत, मोदी सरकारने राममंदिर बांधले नाही तर हे सरकार पुन्हा येणार नाही, असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

केंद्रातील व राज्यातील सरकारचे अपयश झाकण्यासाठीच संघ, भाजप, शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा पुढे केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अयोध्येत राममंदिर बांधू, असे आश्वासन दिले होते. त्याला शिवसेनेचा पाठिंबा होता. मात्र, भाजप आता शिवसेनेला फारसे विचारत नाही. त्यामुळे राम मंदिरावरून भाजपला घेरण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव आहे. प्रभू राम हेच तुरुंगात आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणत असतील तर राम त्यांना कसा आशीर्वाद देतील?
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

मागील साडेचार वर्षांतील अपयशी कारभार पाहता आगामी काळात जनता आपल्याला स्वीकारणार नाही याची जाणीव भाजप- शिवसेनेला झाली आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाचा मुद्दा तापवून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याचा या दोन्ही पक्षाचा अजेंडा आहे. भाजपला राम मंदिर तर बांधायचेच नाही. याद्वारे समाजात धुव्रीकरण करून मते घ्यायची व पुन्हा सत्तेवर यायचे, असा यांचा डाव आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते

अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर काही कागदी होड्या सापडल्या आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी काल आरती झाल्यानंतर आपल्या खिशातील राजीनाम्याच्या कागदी होड्या करून शरयूमध्ये प्रवाहित केल्या आणि त्याच होड्या आज सकाळी नागरिकांना सापडल्या. अयोध्येला गेल्यानंतर ठाकरे आता राम मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभच केल्याशिवाय मुंबईला परत येणार नाहीत, असाच अनेकांचा समज झाला होता; पण ते तर केवळ तीर्थयात्रेला गेले होते.
- राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते

उद्धव ठाकरेंचा हा दौरा म्हणजे इव्हेंट होता. आगामी निवडणुका लक्षात घेता, भाजप-शिवसेना युतीसाठी ही नौटंकी सुरू आहे. शिवसेना-भाजप सत्तेत असूनही गेली चार वर्षे एकमेकांनी विरोधात भूमिका घेतली. मात्र, आता निवडणुका तोंडावर आल्याने एकत्र कसे यायचे, त्यासाठी हा अयोध्या इव्हेंट होत आहे. अयोध्या दौऱ्यात सभा होणार नव्हती, तर मग महाराष्ट्रातून एवढे शिवसैनिक का घेऊन गेले? 
- इम्तियाज जलील, एमआयएम आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com