'राष्ट्रवादी'च्या आमदारांची जबाबदारी शिवसेनेवर 

NCP, Shivsena
NCP, Shivsena

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाने अंतिम सीमा गाठली असून, आमदार पळवापळवीचे प्रकार सुरू झाले आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना घेऊन भाजपच्या गटात सहभागी झाले, तर काही आमदारांचा थांगपत्ता लागत नव्हता. यामुळे आपले आमदार पळवून नेतील, अशी धास्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटू लागली आहे. या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी शिवसेनेने घेतली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांवर पाळत ठेवणे सुरू केले आहे. 

अजित पवार यांच्या राजकीय नाट्यामुळे राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींनी वेगळेच वळण घेतले. त्यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांचा थांगपत्ता लागत नसल्याने शिवसेनेच्या तोंडचे पाणीच पळाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी शिवसेनेने पुढाकार घेत "राष्ट्रवादी'च्या आमदारांना शोधून काढण्याची मोहीम सुरू केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीला जे आमदार अनुपस्थित होते, त्यांना शोधून काढण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याकडे सोपविण्यात आली. या दोघांनी शोध सुरू करीत "राष्ट्रवादी'च्या बेपत्ता आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उदगीरचे आमदार संजय बनसोड यांना मुंबई विमानतळाजवळील सहार हॉटेलमधून एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हॉटेल ललितमध्ये संजय बनसोड यांना आणून भाजपने केलेल्या अपहरणाविषयी विचारपूस केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात नसलेले आमदार संजय बनसोड यांची माहिती नार्वेकर यांनी तत्काळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली. त्यानंतर पवारांच्या सूचनेनुसार माजी आमदार शशिकांत शिंदे हॉटेल ललितमध्ये आले आणि संजय बनसोड यांना सोबत घेऊन जाण्यास यशवंतराव चव्हाण सेंटरकडे निघाले. आमदारांच्या सुरक्षेसाठी स्वतः एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी बनसोड यांना कारमध्ये बसवून शरद पवार यांच्या ताब्यात दिले. 

शिवसेना आमदार मुंबईतच 
शिवसेनेचे सर्व आमदार अंधेरी मरोळ येथील ललित या हॉटेलमध्ये वास्तव्यास असून, त्यांना तेथेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील राजकीय घडामोडींनंतर शिवसेनेच्या आमदारांना राज्याच्या बाहेर हलविण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, राजकीय घडामोडींना वेग आल्याने शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आणि शिवसेनेच्या आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com