मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. मुख्यमंत्री राजीनामा देणार काय असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार नाहीत, आम्ही लढत राहू असे सांगितले आहे. (Shivsena MP sanjay raut on resignation of cm uddhav thackeray amides maharashtra political crisis)
मुख्यमंत्री वर्षा बंगल्याहून मातोश्रीवर राहण्यासाठी निघाले आहेत. मोह माया सत्ता याचा आम्हाला अजिबात लोभ नाही आम्ही लढणारे लोक आहोत, लढत राहू. अखेर सत्याचा विजय होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच त्यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सद्भावना प्रकट केल्या, आम्ही त्यांचे आभारी आहोत असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि राहतील, सभागृहात संधी मिळाली तर आम्ही बहुमत सिद्ध करू, असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला. शरद पवारांनी मुख्यमंत्री पद सोडण्याचा असा कोणताही सल्ला दिला नाही. ही लढाई शेवटपर्यत लढायची ही भूमिका शरद पवार यांनी घेतल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
तुम्हाला नको असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, तुम्ही समोर येऊन सांगा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांची ऑफर फेटाळून लावली असून ते सत्तेतून बाहेर पडण्यावर ठाम असल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत काही मुद्दे मांडले आहेत, ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असे ट्वीट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.