Sanjay Raut
Sanjay Raut

भावाच्या चौकशीवर उद्धव ठाकरे यांचे लक्ष : संजय राऊत

मुंबई : या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही असे बुधवारी उद्धव ठाकरे म्हणाले आणि मलाही तेच वाटते. चौकशी ही एक प्रक्रिया असते त्यातून लोक तावून सुलाखून बाहेर पडतात अनेकदा आपण आता त्याकडे तटस्थपणे पाहायला हवे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी आज (गुरुवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊत म्हणाले, ''राज यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही सोबत गेले आहे. स्वतः उद्धव ठाकरे या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. काल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नक्कीच काल उद्धव साहेबांनी भाऊ म्हणून भावना व्यक्त केल्या त्या महत्त्वाच्या आहेत. राजकरणात मतभेद असू शकतात पण प्रत्येक जण कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणून आपापली भूमिका पार पाडत असतो. मला आठवतं कि राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्यावर काही प्रकरणात दोषारोप झाले होते. तेव्हा CBI ने चौकशीला बोलवले, त्यावेळी मी, उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर होतो. CBI कार्यालयापर्यंत त्यांच्याबरोबर गेलो होतो. हि रक्ताची नाती मैत्रीची नाती असतात आणि महाराष्ट्रात विषेशतः मराठी कुटुंबात हि नाती आपण जपत असतो. उद्धव ठाकरे नात्यांबाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत.उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंशी संवाद झाला की नाही हे टीव्हीवर सांगण्याची गोष्ट नाही. काल त्यांनी जाहीर वक्तव्य केले आणि त्या दोन ओळीत त्यांना काय सांगायचे आहे त्यांच्या भावना स्पष्ट झाल्या आहेत.''

सत्यनारायणाची पूजा की श्रावणातील पूजा या नस्त्या उठाठेवी कुणी करू नयेत. अशा प्रसंगात कुटुंबातील प्रमुख माणसाला आधार द्यायचा असतो. राजकीय कार्यकर्ते असतात. पण कुटुंब आधार महत्वाचा असतो. म्हणून तर काल उद्धव ठाकरेंनी आधार दिलाय. जेव्हा आम्ही कोर्टात जायचो तेव्हा कुटुंब म्हणून सर्व एकत्र असायचो. हि एक परंपरा आहे..कुणी खून केलेला नाही. कुटुंबाने सोबत जाणं यांच्यावर टीका करणे हे चांगल्या संस्काराचे लक्षण नाही. ज्यांना कुटुंब आहे तेच कुटुंबाविषयी बोलतात. नाती जपण्याची परंपरा आहे तेच कुटुंबाला घेउन जात असतात. कुटुंबावरती टीका करणे हे अत्यंत हीनपणाचे लक्षण आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे हे नेते आहेत म्हणून त्यांच्यावर जास्त फोकस किंवा कँमेरा असू शकतो. प्रकरणात बाकी जे गेले चौकशीला ते उद्योजक आहेत...

CBI आणि ED चौकशीच्या घटना या देशात अनेकदा घडल्याहेत. हे काही नवे नाही. जर आपण काही गुन्हा केला नसेल तर बेडरपणे सामोरे जाणं हा एकमेव मार्ग. अमित शाह आणि नरेंद्र मोदी त्यांनासुद्धा या प्रक्रियेतून जावे लागले. या अग्निपरिक्षेला सामोरे गेले आणि आज ते देशाच्या सर्वोच्च पदी पोहोचले आहेत.


वैयक्तिक मित्र म्हणून राज ठाकरेंबाबत ज्या उद्धव ठाकरेंच्या भावना आहेत त्याच माझ्याही आहेत. राजकारणात आम्ही सतत एकमेकांच्या विरुद्ध उभे आहोत, पण संकट काळात परिवार एक असतो, मतभेदांची जळमटं गळून पडतात हे उद्धव ठाकरे यांनी दाखवले. हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आमच्यावर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com