सोलापूर - बाजारामध्ये साखरेच्या कोसळलेल्या भावामुळे साखर कारखानदारांपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे देणेही त्यांना जिकिरीचे वाटू लागले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी "सकाळ'ला दिली.
सहकारमंत्री देशमुख यांनी आज "सकाळ' कार्यालयास भेट देऊन "संवाद' साधला. त्या वेळी ते बोलत होते.
देशमुख म्हणाले, "साखरेचे दर वाढल्याशिवाय शेतकऱ्यांना उसाचे पैसे देणे शक्य नाही. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारकडे साखर निर्यात करण्याबाबतची शिफारस केली जाणार आहे. राज्यातील साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या महिनाअखेरीस बैठक होईल. राज्यात सध्या स्वस्त दरात वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे पूर्वी सहा रुपये प्रतियुनिट होणारे विजेबाबतचे करार आता होत नाहीत. विजेच्या युनिटचे दर कमी झाल्यामुळे जादा दर देऊन साखर कारखानदारांकडून वीज खरेदीबाबत आता महावितरण सकारात्मक दिसत नाही. त्यामुळेच आता साखर कारखानदारांबरोबरचे करार थांबले आहेत.''
सहकारी संस्थांची सुनावणी घेण्याचे अधिकार यापूर्वी सहकारमंत्र्यांना होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अविश्वास निर्माण झाला होता. सत्ताधारी पक्षाचे मंत्री विरोधी पक्षांच्या संस्थांच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित निर्णय घेतात, असा आरोप केला जात होता. त्यामुळे संस्थांच्या संदर्भातील सुनावणीचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
|