सोलापूर - हमीभावाने तुरीची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये जावे लागू नये, यासाठी त्यांची नोंदणी करण्यासाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे. राज्यात आतापर्यंत साडेतीन हजार क्विंटलहून अधिक तुरीची खरेदी हमीभावाने झाल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
राज्यात एक फेब्रुवारीपासून हमीभावाने तुरीची खरेदी सुरू झाली आहे. राज्यातील 160 तूर खरेदी केंद्रांवर 339 शेतकऱ्यांची तीन लाख 75 हजार 569 क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. तूर खरेदी केंद्रांत एक लाख 46 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यात तूर खरेदी तीन महिने चालणार आहे. तूर खरेदीसाठी उपलब्ध केंद्राशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार केंद्रे सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तूर खरेदीसाठी शेतकरी नोंदणी आवश्यक असून, त्यासाठी NELM पोर्टल सुरू केले आहे. यावर ऑनलाइन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर अथवा बाजार समिती आवारात जावे लागू नये, यासाठी मंडळ स्तरावर अथवा मोठ्या गावांमध्ये तुरीची नोंदणी करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे.
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
नोंदणीच्या वेळी शेतकऱ्यांनी आधार कार्डची छायांकित प्रत, सुरू असलेल्या बॅंक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत अथवा त्या खात्याचा रद्द केलेला धनादेश (चेकबुक), सातबारा उतारा ही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरेदीचे चुकारे ऑनलाइन बॅंक खात्यात होणार असल्यामुळे बॅंक खात्याची नोंदणी अचूक करावी. जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
|