मुंबई - शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी जोपर्यंत सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्प राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्णपणे दिवसा वीज देणे शक्य होणार नाही. सध्या दिवसा आणि रात्री अशा पद्धतीने वीजपुरवठा केला जात आहे. तसेच परभणी मंडळाचे एचव्हीडीएस योजनेचे काम करणारा संबंधित कंत्राटदार निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी दराचा म्हणून त्याला काम मिळाले, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.
आमदार विजय भांबळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ऊर्जामंत्री बोलत होते. या प्रश्नात आ. भांबळे यांनी सांगितले की, सुदर्शन एजन्सी या कंत्राटदाराने इन्फ्रा-2 ची कामे संथ गतीने केली. त्यावर ऊर्जामंत्र्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. तरी पुन्हा त्याच कंत्राटदाराला एचव्हीडीएस योजनेचे काम कसे देण्यात आले? याआधीच्या अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित कंत्राटदाराला अपात्र ठरविले, आणि आता नव्या योजनेसाठी त्याला पात्र कसे ठरविण्यात आले, असा प्रश्न भांबळे यांनी उपस्थित केला.
दिवसा वीज पुरवठ्याची मागणी
आमदार अमित देशमुख यांनी दिवसा वीज पुरवठ्याची मागणी केली. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, भंडारा, गोंदिया, गडचिरोली भागातील धान पिकाला मध्यंतरीच्या काळात पाण्याची आवश्यकता होती. काही दिवसांसाठी या शेतकऱ्यांना 12 तास वीजपुरवठा करण्यात आला. तसेच सहा लाख शेतकरी यावर्षी सौरऊर्जेशी जोडण्यात येणार आहे. येत्या 4 ते 5 वर्षांत सर्व शेतकरी सौर ऊर्जेवर आल्यास शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होईल, असेही बावनकुळे म्हणाले.
|