राज्यात लवकरच स्थिर सरकार : रोहित पवार

 Soon steady government in maharastra; Rohit pawar says
Soon steady government in maharastra; Rohit pawar says

नगर : ""सरकार स्थापनेसंदर्भात महाशिवआघाडीत चर्चा सुरू आहे. जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्ती व शेतकऱ्यांच्या विकासाला गतिमान करणारे स्थिर सरकार लवकरच राज्यात स्थापित होणार आहे,'' असा विश्‍वास रोहित पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 
आमदार पवार यांनी आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील बाधित क्षेत्राची माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप आदी उपस्थित होते. 


पवार म्हणाले, ""मागील महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. नुकसानीच्या पंचनाम्याचे काम जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर पूर्ण करीत आणले आहे. बाधित क्षेत्राची संख्या वाढू शकते. दोन दिवसांत अडचणीच्या ठिकाणांचे पंचनामे पूर्ण होतील. ज्वारी-बाजरीच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांनी कंपन्यांकडे विमा हप्ता भरला होता, त्यापैकी 50 टक्के शेतकऱ्यांना विमा कंपनीने विम्याचा लाभ दिला. मात्र, उर्वरित शेतकरी वंचित राहिले. या संदर्भात पुणे येथे कृषी आयुक्तांशी चर्चा केली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळण्यास मदत होईल.'' 


फळबागेचा विमा उतरवताना लिंबू व पेरूउत्पादक नियमामुळे शेतकरी वंचित राहतात. या संदर्भात प्रशासन, विमा कंपन्यांची चर्चा केली आहे. यापुढे लिंबू व पेरू फळबाग असलेल्या शेतकऱ्यांनादेखील विम्याचा लाभ होईल. अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करीत असताना जिल्हा प्रशासनात तलाठ्यांची पदे कमी असल्याचे स्पष्ट झाले. तलाठ्यांच्या रिक्त पदांवर भरती करण्यासंदर्भात आपण प्रशासनाशी चर्चा केली. मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळी अनुदान प्राप्त झाले. यापैकी साडेसात लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर चारशे कोटींचे अनुदान जमा करण्यात आले. कुकडी प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहनही पवार यांनी केले. 


जिल्ह्याला मिळेल योग्य स्थान 
""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्‍वास टाकला. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने पाठबळ दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची ताकद वाढली. सत्तेच्या समीकरणात जिल्ह्याला योग्य ते स्थान देण्याबाबत वरिष्ठ नेतेमंडळी नक्कीच निर्णय घेतील,'' असा विश्‍वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com