महिला दिन 2019 : स्त्रियांचे जगण्याचे समाजभान... 

Spacial article for Woemes day
Spacial article for Woemes day

महिला दिन 2019 :  पुणे : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी "अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, माणुसकीचा ना दाणा कानी पडलं कनूस' असे वर्णन करीत लेखनामधून माणसाचे; विशेष स्त्रियांचे विश्‍व उभे केले आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचे जगणे ताराबाई शिंदे यांनी आपल्या "स्त्रीपुरुषतुलना'मधून दाखविले आहे. त्यांचे हे छोटेखानी पुस्तक 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले आहे. म्हणजे, आज या पुस्तकाला 137 वर्षे झाली आहेत. समाजात घडत असलेल्या घटनांवरून, स्त्रियांवरील होणारा अन्याय, शोषण, यातना पाहून त्यांच्यातील संवेदनशील मनाने स्त्रियांची ही दुर्दशा शब्दरूपात मांडली आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी ताराबाई शिंदे यांच्या विचाराचे महत्त्व जाणले होते. त्यांनी आपल्या "सत्सार अंक-2'मध्ये त्यांचे कौतुक केले होते. 

स्वतंत्र बाण्याचा आविष्कार 
बुलडाण्यासारख्या त्या काळी मागास समजल्या जाणाऱ्या छोट्या गावात राहणाऱ्या बाईने एवढे प्रखर व वास्तव विचार साकारणे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्यच आहे. या साऱ्याचे श्रेय त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे यांना जाते. ते महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या घरापासूनच समतेला सुरवात करीत चार मुलांच्या बरोबरीने पाचवी मुलगी ताराबाईंना वाढविले. स्वतंत्र विचारांच्या ताराबाईंची बंडखोरी वृत्ती या पुस्तकातून दिसते. "ज्या परमेश्‍वराने ही आश्‍चर्यकारक सृष्टी उत्पन्न केली, त्यानेच स्त्री-पुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे साहास दुर्गुण स्त्रियांच्याच अंगी वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगी आहेत, तेच पुरुषांत आहेत किंवा नाहीत, हे स्पष्ट करून दाखवावें, याच हेतूने हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहे आहे,' असे प्रस्तावनेत त्यांनी स्पष्ट केले आहे. 

विधवा महिलांचे दुःख 
त्या काळी गाजलेल्या विजयलक्ष्मी या विधवा महिलेवरील खटल्याची पार्श्‍वभूमीवर "विधवा महिलांचे जगणे व समजाने लादलेल्या स्त्रीधर्मा'वर प्रकाश टाकत "नवरा मेल्यावर सर्व त्रास स्त्रियांनाच का? बायको मेल्यावर लगेच दुसरी करायला पुरुषांनाच मोकळीक का? नवरा मरावा म्हणून स्त्रियांनी देवाला प्रार्थना केली होती का?,' असा सवाल त्या करतात. "प्रार्थना केलीही असती; पण विधवेचे भयानक जीवन वाटेला येऊ नये म्हणून तरी त्या तसे करणार नाहीत, असा टोलाही त्यांनी मारला आहे. 

पुराणातील उदाहरणे 
पुराणातील सती सावित्रीच्या कथेवर युक्तिवाद करताना "सावित्री पतीच्या प्राणासाठी यमदरबारात पोचली. तसा पत्नीप्रेमासाठी कोणी पुरुष यमदरबारी पोचला असल्याचा दाखला आहे का? असे त्या विचारतात. बायकोला नवराच देव, तर नवऱ्याची वागणूकदेखील देवाप्रमाणेच पाहिजे, अशी अपेक्षाही त्या व्यक्त करतात. इतर देव-देवता व ऋषीमुनींचा इतिहास पाहिला तर तो काही माणसांपेक्षा वेगळा नाही, असे मत व्यक्त करताना रामायण, महभारत, पांडवप्रतापमधील उदाहरणे ताराबाईंनी दिली असून, देव व ऋषींनीही आपल्या बायकांबरोबर चांगले व्यवहार केले नसल्याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली आहेत. 

सुधारणावादी इंग्रजांचे कौतुक 
इंग्रज सरकारचे त्या कौतुकही करतात. याचे कारण म्हणजे त्यांनी महिलांच्या बाजूने केलेले कायदे व सुधारणा, याला त्यांनी महत्त्व दिले आहे. यात देशभक्तीविरोध कोठेही दिसून येत नाही. उलट आपली परंपरागत वेशभूषा सोडून साहेबाचे अनुकरण करणारे टीकेला पात्र ठरतात, असे ताराबाईंनी म्हटले आहे. ताराबाई शिंदे यांचे हे लेखन अतिशय परखड असून, उपहास-उपरोधातून त्यांनी समाजात कनिष्ठ मानले गेलेल्या स्त्रियांचे श्रेष्ठत्व यातून दाखवून दिले आहे. बोलीभाषेतील त्यांची शब्दरचनाही आक्रमक व दाहकता दर्शविणारी आहे. शंभर वर्षांपूर्वी एका स्त्रीने व्यक्त केलेले हे क्रांतिकारी विचार आजच्या समाजालाही अनेक बाबतीत लागू पडतात, याची जाणीवही यातून होते. 

पुस्तकाचा प्रसार 
ताराबाई शिंदे यांचे "स्त्रीपुरुषतुलना' हे मूळ पुस्तक आता दुर्मिळ झाले आहे. 1882 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकाची 1975 मध्ये स. गं. मालशे यांनी प्रथम संपादित आवृत्ती प्रसिद्ध केली. यानंतर अभ्यासक व वाचकांचे लक्ष याकडे वेधले गेले. त्याच्या आवृत्त्याही पुढे निघाल्या. नागनाथ कोत्तापल्ले आणि विलास खोले यांनी संपादित केलेल्या स्वतंत्र आवृत्त्याही प्रकाशित झाल्या आहेत. शिवाय, मुंबईतील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने "महाराष्ट्राचे शिल्पकार ताराबाई शिंदे' या इंद्रजित भालेराव लिखित पुस्तकाच्या दोन आवृत्या प्रकाशित केल्या आहेत. ताराबाईंच्या या पुस्तकाचे महत्त्व जाणून त्याचा इंग्रजी अनुवादही झाला आहे. अन्य प्रकाशनांची यासंदर्भात पुस्तके आहेत. 

लेखन परंपरा 
ताराबाई शिंदे यांच्याप्रमाणेच जुन्या काळात निवडक महिलांनी विविध विषयांवर लेखन केलेले आढळते. यात लक्ष्मीबाई टिळक, काशिबाई कानिटकर, गिरिजाबाई केळकर, बहिणाबाई चौधरी, आनंदीबाई शिर्के, उमाबाई गर्दे, गोदावरीबाई पंडित यांचा उल्लेख करता येईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com