मुंबई - महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील 100 कैद्यांना विशेष माफी देण्यात आली आहे. यास पात्र झालेले सर्वाधिक कैदी हे तळोजा येथील तुरुंगातील आहेत. शुक्रवारी (ता. 5) या सर्व कैद्यांची सुटका होणार आहे.
तुरुंगातील कैद्यांची दिवसेंदिवस वाढती संख्या कमी करण्याकरिता केंद्र सरकार विविध उपाययोजना करीत आहे. किरकोळ गुन्ह्यांत शिक्षा झालेल्यांची संख्या अधिक आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतली.
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने कैद्यांना विशेष माफी देण्याचे ठरवले. त्यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या (अपिल व सुरक्षा) अध्यक्षतेखाली प्रधान सचिव (विधी व न्याय), पोलिस महासंचालक (तुरुंग) अप्पर पोलिस महासंचालक (तुरुंग) यांची समिती तयार केली. समितीने राज्यभरातील तुरुंगातील कैद्यांचा आढावा घेत 100 कैद्यांना विशेष माफी दिली आहे.
2 ऑक्टोबर 2018 पासून वर्षभरात तीन टप्प्यांत या कैद्यांची सुटका होणार आहे. यात तळोजा तुरुंगातील 42, येरवडातील 24, कोल्हापुरातील 9, नागपूरमधील 4 आणि मुंबई मध्यवर्ती आर्थर रोडमधील 3, ठाण्यातील 1, धुळ्यातील 1, अमरावती 2, वर्धा आणि औरंगाबादमधील प्रत्येकी 3 कैद्यांचा समावेश आहे.
|