टिचभर पोटासाठी घरातून बाहेर पडणारी चाकर माणसं, भारताचं उज्ज्वल भविष्य हाती असणारे शाळा-कॉलेजातील विद्यार्थी, महिला, वृद्ध, आजारी माणसं माझी सेवा बंद पडल्याने जागच्या जागी अडकून पडतात. जणू त्यांचा श्वासच थांबतो. कुणाची माय लेकराच्या वाटेकडे डोळे लावून असते. तर कुणाला पोटापाण्यासाठी वेळेत पोहोचायच असतं. शाळा-कॉलेज, कारखाने विनाकारण बंद ठेवावे लागतात. तर लाखो प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
शहरात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा आंदोलन काळात न मिळाल्याने त्यांची उपासमार होते ती वेगळीच.
आंदोलकांच्या हाती चक्का जाम, धरणे, घेराव, मूक मोर्चा असे अनेक पर्याय असताना मलाच पेटवण्याला प्राधान्य का बरं देता. या भडकलेल्या ज्वाळांची झळ तर सर्वांनाच बसते.
माझ्या इतर भगिनीं आंदोलनाच्या धगीने भाजून, पोळून निघतात. या दरम्यान काही खासगी वाहतूकदारांना अडकून पडलेल्या प्रवाशांची आयती आर्थिक शिकार मिळते. स्वस्तातली एसटी सेवा कोलमडल्याने त्यांच्या मनमानी कारभाराला बळी पडणाऱ्यांचे हाल पाहून माझे हळवे मन करपून जाते, असंख्य विषारी नागांनी दंश केल्याची तीव्र वेदना घायाळ करते.
शिवनेरी, शिवशाही, यशवंती, अश्वमेघ अशा अनेक रूपांचा माझा मुक्त विहार महाराष्ट्रासह इतर राज्यातही दिमाखदार असतो. राज्याचे उत्पन्न वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलणारी केवळ मीच आहे. तुमच्या सुख दुःखांची साक्ष देणाऱ्या माझ्यासारख्या लाखो पऱ्या राज्याच्या काणाकोपऱ्यातील रस्त्यांवरून अविरत धावत आहेत. आंदोलनात त्यांची चाके आगीच्या भस्मस्थानी देऊ नका... आमच्या मरणाचे सरण तुम्ही रचू नका... अन् तुमच्याच हक्काच्या सुरक्षित प्रवासावर कुऱ्हाड चालवू नका... कृपया निष्पाप प्रवाशांच्या खोळंब्याला कारणीभूत ठरू नका...
|