विदर्भात अवकाळी, गारपिटीने पिकांचे नुकसान

Storm-Rain
Storm-Rain

पुणे - पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या परस्परविरोधी क्रियेमुळे विदर्भात अवकाळी पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट झाली.

यामुळे गहू, हरभरा, मिरची पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भात उद्या (ता. २६) हलक्या पावसाची शक्यता असून, शनिवारी (ता. २७) मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. यात आर्वी, सावनेर, सेलू, कुही, खारंघा, आमगाव, पारशिवाणी प्रत्येकी २०, नागपूर, रामटेक, कामठी, सालकेसा, भंडारा, मोहाडी, हिंगणा, देवळी, गोंदिया, भिवापूर, वर्धा, मौदा, गोरेगाव, कळमेश्वर प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयातर्फे सांगण्यात आले. तर नागपूरमधील मौदा, खात, देवमुंढरीत गुरुवारी सायंकाळी बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातही गारांचा पाऊस झाला. 

दक्षिण मध्य प्रदेश आणि परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या स्थितीपासून मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावरही ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पूर्व विदर्भाला सर्वाधिक फटका
नागपूर - पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस, गारपिटीने गहू, हरभऱ्यासह भाजीपाल्याला फटका बसला आहे. भंडारा गोंदियात २३८ हेक्‍टर बाधित क्षेत्राची नोंद प्राथमिक स्तरावर करण्यात आली असली तरी हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. पश्‍चिम विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्‍या पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची शक्‍यता कृषी विभागाने फेटाळली आहे. उलट हा पाऊस पिकांसाठी पोषक ठरल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे.

पूर्व विदर्भातील, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यासह पश्‍चिम विदर्भातील अमरावती, वर्धा जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्‍यात गारपीट झाली. गारपीट आणि पावसामुळे मोहाडी तालुक्‍यात सर्वाधिक २३८.९० हेक्‍टर नुकसान झाल्याचे प्राथमिक सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यमाध्ये गहू ९८, हरभरा ४०, लाखोळी ७९.५० तसेच भाजीपाला २१.४० हेक्‍टर याप्रमाणे आहे. नागपूर, वर्धा जिल्ह्याच्या काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गहू आडवा झाला. त्याचा थेट उत्पादकतेवर परिणाम होणार असल्याने सर्वेक्षणाची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १४५.९० मिमी. पावसाची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com