राज्यात या वर्षी साखर उत्पादन निम्म्यावर

राज्यात या वर्षी साखर उत्पादन निम्म्यावर

कोल्हापूर - गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस, त्यामुळे घटलेले उसाचे उत्पन्न यामुळे नुकत्याच संपलेल्या या वर्षीच्या साखर हंगामात राज्यात गेल्या वर्षीपेक्षा निम्मेच साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी राज्यात साखरेचे उत्पादन 84.15 लाख टन झाले होते. या वर्षी ते 41.80 लाख टनापर्यंत खाली आहे.

दरम्यान, बाजारातही साखरेची मागणी नसल्याने व गुजरातसह इतर राज्यात उत्तरप्रदेशची साखर महाराष्ट्राच्या तुलनेत कमी दराने मिळत असल्याने राज्यातील साखरेचा उठावच नाही. 31 मार्चअखेर राज्यात सुमारे 41 लाख टन साखर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. या साखरेमुळे कारखान्यांची गोदामे "हाउसफुल्ल' आहेत. या विचित्र परिस्थितीमुळे देशातील दुसऱ्या क्रमांकाचा समजला जाणारा हा साखर उद्योग अडचणीत सापडला आहे.

या वर्षीचा हंगाम 10 एप्रिल रोजी संपला. नोव्हेंबरपासून 10 एप्रिलपर्यंत राज्यातील सहकारी 99 व खासगी 78 कारखान्यांनी हंगाम घेतला. 10 एप्रिल रोजी संपलेल्या हंगामात राज्यात 372.45 लाख टन उसाचे गाळप होऊन 41.80 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या 25 वर्षांतील साखर उत्पादनाचा हा निच्चांक आहे. ज्या सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी किमान 200 लाख टन ऊस गाळप होत होते, त्या ठिकाणी केवळ 40 लाख टन गाळप झाले आहे. मराठवाडा, विदर्भ व नगर विभागातही गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्केही गाळप झालेले नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात 75 टक्‍क्‍यांपर्यंत गाळप झाले आहे.

हंगामाच्या सुरवातीला राज्यात 37 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा शिल्लक होता. त्यात या वर्षीच्या 41.80 लाख मेट्रिक टन साखरेची भर पडली. राज्यातील साखरेची गरज केवळ 28 ते 30 लाख टन आहे.

उर्वरित साखरेला गुजरातसह आंध्र प्रदेश, ओडिशा ही राज्ये बाजारपेठ आहेत; पण या राज्यात उत्तर प्रदेशची साखर महाराष्ट्राच्या साखरेपेक्षा प्रतिटन 100 ते 150 रुपये कमी दराने मिळत असल्याने राज्यातील साखरेला या राज्यांतून मागणीच ठप्प आहे. परिणामी कारखानदारांना एक तर राज्यातच ग्राहक शोधावे लागतील किंवा कमी दराने ती इतर राज्यात पाठवावी लागेल; पण दोन्ही व्यवहारात तोटा असल्याने त्याचा मोठा अर्थिक फटका साखर उद्योगाला शक्‍य आहे.

परराज्यात साखरेला मागणी नाही
महाराष्ट्रातील साखरेपेक्षा उत्तर प्रदेशची एम 30 साखरही अधिक दर्जेदार व शुभ्र आहे. त्यातच कमी दराने ती मिळत असल्याने गुजरातला या वर्षी एक पोतेही साखर महाराष्ट्रातून गेलेली नाही. उत्तर प्रदेशची एम30 ही साखर गुजरातला सर्व करासहित 3580 ते 3600 रुपये प्रतिटन मिळते, तर महाराष्ट्रातील याच दर्जाच्या साखरेला गुजरातमध्ये प्रतिटन चार हजार रुपयांपर्यंत दर जात असल्याने राज्यातील साखरेला मागणी नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com