शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविणाऱ्यांना पाठिंबा -  राजू शेट्टी

शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविणाऱ्यांना पाठिंबा -  राजू शेट्टी

देहू - ""देशातील विविध शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी एकत्र आलेल्या आहेत. संघटनांची विचारधारा वेगवेगळी असली तरी मागणी एकच आहे. त्यामुळे या देशातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव आणि शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कर्जमुक्त करेल, त्याच पक्षाच्या मागे आम्ही जाऊ,'' अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक देहूतील संत तुकाराम मंगल कार्यालयात झाली. या वेळी संघटनेचे डॉ. प्रकाश पोकळे, रविकांत तुपकर, राजेंद्र ढवाण, रसिका ढगे, हंसराज वडघुले, माणिकराव कदम, योगेश पांडे, प्रकाश बालवडकर बैठकीस उपस्थित होते. राज्याच्या विविध भागातून पाचशेहून अधिक शेतकरी प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार राजू शेट्टी "सकाळ'शी बोलत होते. 

शेट्टी म्हणाले, ""गेली अनेक वर्षे राजकारणात शेतकरी उपेक्षित राहिलेला आहे. शेतकऱ्यांचा केवळ वापर केला गेला. खरे तर विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने असतो. आघाडीच्या सरकारच्या काळात भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष होता. सत्तेत आल्यानंतर स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. आता मात्र देशपातळीवर सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. या सर्व संघटना दोन मुद्यांवर एकत्रित आहेत. त्यात उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा आणि सातबाऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करावा. सहावा आणि सातवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना दिला. मात्र, गेली अकरा वर्षे शेतकऱ्यांना सरकारने काय दिले? काहीच दिले नाही. त्यामुळे या दोन गोष्टी जे सरकार करेल त्याच्यामागे आम्ही जाऊ.'' 

येत्या 25 एप्रिलला राज्यसभेत सर्व विरोधी पक्ष याबाबत विधेयक मांडणार आहेत. या विधेयकात संपूर्ण कर्जमुक्ती मिळण्याचा अधिकार आणि शेतीमालाला हमीभाव 2018 हे विषय असणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कोणत्याही पक्षाला शेतकऱ्यांना फसविणे सोपे नाही. 

शेट्टी म्हणाले... 
- सरकार सर्व विषयांवर निरुत्तर असते, तेव्हा दंगली घडविल्या जातात. 
- हल्लाबोल आंदोलनात शेतकऱ्यांचे प्रश्‍न राष्ट्रवादी कसे सोडविणार हे ऐकण्यासाठी येतात. 
- सरकारने जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com